Sunday, June 28, 2009

बोधकथा-३

माझ्या पूर्वीच्या बोधकथा फारच लांबड्या आणि रद्दड होत्या असे मला जाणवले. मी परत वाचून नाही बघितल्या पण मला आतून जाणवले तसे. ही पण रद्दडच होईल.
*

ही मन्याची गोष्ट आहे. मन्या एक साधा, सरळमार्गी, पापभिरू-बापूबिरु मुलगा होता.
पापभिरू-बापुबिरु टर्म बद्दल स्पष्टिकरण गरजेचे आहे. मुळात बापुबिरु वाटेगावकर हा एक चांगला रॉबिनहूडसदृश मनुष्य होता असे खटाव तालुक्यातील व आसपासच्या भागातले लोक मानतात. मीपण तसेच मानतो (बरेच लोक तसे मानत नाहीत)
पापभिरू-बापुबिरु म्हणजे, जो शक्यतो पापभिरु असतो पण त्याच्याबाबत कुणी काही अन्याय/पाप केले की चिडतो आणि मग त्रास देतो. म्हणजे ज्याला वाईट लोकांशी वाईट वागावे लागते तेपण वाईटांनी खोडी काढल्यावर असा मनुष्य. मग तो वाहवत जाउन पर्मनंट वाईट बनतो. मूळचा मनाचा चांगलाच असतो तो पण.

तर मन्या तसा होता, म्हणजे अन्याय झाल्यावर डायरेक्ट हिंसाबिंसा नाही, आपल्यावर अन्याय करणाऱ्यांचा जमेल तसा कॉन्फरन्स ब्रिजवर जाहीर अपमान करणे किंवा ५० एक लोक असतील अशा महत्वाच्या ईमेल-चेन मधे अशा लोकांचे अज्ञान दाखवून त्यांचा पोपट करणे ही त्याची मोडस ऑपरेंडी. असो, तर गोष्ट सुरु.

मन्याच्या आयुष्यात अशी फेज आली की त्याला वाटले, खूप झाले वाईट वागणे. व्यवहारात असेच करावे लागते म्हणून किती दिवस करायचे? आपण आता एकदम चांगले वागायचे.
मन्या प्रचंड मेथोडिकल प्राणी.
रोज आपण सर्वात जास्त वाईट वागतो त्या क्षेत्रात चांगले वागणे जमले तरच खरे. म्हणून त्याने नोकरीत चांगले वागायचे ठरवले. तो प्रोफेशनल होताच पण चांगले वागण्यात नक्कीच कमी पडायचा.
आपण काय करतोय त्याबबतीत फंडे क्लिअर असावेत म्हणून त्याने "चांगले वागायचे" म्हणजे कसे याचे नियम ठरवले -
१. वाईट लोकांशी शक्यतो वाईट वागायचे नाही. वाईट कोण वगैरेची व्याख्या त्याला गरजेची नाही वाटली. ज्याचे त्याला कळत असते कोण वाईट आहे ते.
२. कुठल्याही मेलमधे किंवा कॉलवर "टू द पॉईंट" उत्तरे द्यायची, वैयक्तिक पूर्वग्रह प्रदर्शित करायचे नाहीत.
३. स्वत:वरही अन्याय होउ द्यायचा नाही. स्वत:वर अन्याय होत आहे असे वाटल्यास करणाऱ्यांना सरळ सांगायचे - हे चूक आहे. बदला म्हणून आपण काही चूक वागायचे नाही.
मन्याच्या मते तिसरा पॉईंट महत्वाचा होता, बरेच संत लोक स्वत:वरच्या अन्यायाची दखल घेत नाहीत, जे चूक आहे असे त्याला वाटायचे.
असे एकुण ग्रॉउंडवर्क झाल्यावर त्याला वाटले आपल्याला हे जमू शकते कारण वागणुकीत जास्त काही बदल नाहीयेत. फक्त स्वत:हून कुणाची खोडी काढायची नाही, आणि कुणी आपली खोडी काढली तर तिसऱ्या नियमानुसार वागायचे.

त्याने तसे वागायला सुरु केले. दिवस चालले होते, साधारण महिना झाला तरी कोणी काही दखलच घेईना. म्हणजे कुणी दखल घ्यावी म्हणून त्याने असे वागणे सुरु केले नव्हते, पण लोकांना इन जनरल कळायला पाहिजे की हा किती चांगला वागतोय ते. लोक दखल घेत नाहीयेत हे बरेच आहे असे म्हणून त्याने चांगले वागणे सुरुच ठेवले.

दिवस तसे वाईट होते, मंदीचे होते. त्याच्या ऑफिसला कळून चुकले आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, ऑफिसने मोहिम हाती घेतली - सगळीकडे आपला प्रेजेन्स दाखवायचा. ईतरांनी म्हणले पाहिजे, हे लोक नसतील तर शक्य नाही बुवा क्लायेंटला सांभाळणे.

मन्यालाही ऑर्डर्स मिळाल्या की, दुसऱ्या सेंटरमधल्या कुणालाही अनॉफिशीयली मदत करायची नाही.

मग एक स्कँडल झाले. स्कँडल शब्दासारखे भयानक असे स्कँडल नाही, मन्याच्या मनातले स्कँडल - त्याला संभ्रमात टाकणाऱ्या दोन घटना -
१. दुसऱ्या सेंटरमधे एक अतिमहत्वाचा ईश्यू झाला, ज्यात फक्त मन्याच मदत करु शकणार होता. मन्याने आपल्या सर्व जुन्या मित्रमैत्रिणींच्या छोट्याश्या मदतीच्या याचना कठोर हृदयाने ठोकारल्या. मग ऑफिशियली त्याच्या स्वत:च्या सेंटरकडून आदेश आल्यावर त्याने एका फटक्यात सगळ्यांना मदत करुन ईश्यू संपवला.
मन्याच्या व त्याच्या सेंटरच्या स्तुतीचे मेल वाहू लागले. आपल्या चांगले वागण्याच्या निग्रहानुसार त्यानेपण लिहून टाकले- मी योग्य मार्गदर्शन केले तसेच इतरांनीपण मोलाचे काम केले. हे वाचून त्याची मदत घेणारे इतरेजनपण खूश झाले.

२. काही दिवसांनी दुसऱ्या सेंटरमधे परत तसा़च एक अतिमहत्वाचा फक्तमन्या ईश्यू झाला. मन्याच्या सेंटरमधे त्या इश्यूची विशेष कल्पना नव्हती तोवर त्याने आपल्या मित्रमैत्रिणींना कटकट नको म्हणून फटकन ऑफलाईन मदत केली.
जास्त लांबड न लागता सर्व रामायण संपले म्हणून तो शांत झोपी गेला. सकाळी उठून बघतो तर काय - ज्यांना मदत केली त्यांनी उगाचच जगभराला एक मेल केला की, "काल असे असे झाले व आम्ही सगळे आमचे आम्ही निस्तरले." एकुण मन्याची, तुमच्या सेंटरची गरज नाही आम्ही स्वावलंबी आहोत असा उग्र दर्प होता त्यात.
आता "चांगले वागणे"च्या तिसऱ्या नियमानुसार तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात असे तरी कसे सांगणार मन्या, तसे म्हणाला असता तर त्याला आपल्या साहेबांचे जोडे बसणार.
मग मन्याने ज्या मनुष्याला ऑफलाईन मदत केली त्यालाच ऑफलाईन जाब विचारला तर त्याला उत्तर मिळाले - एक ओशाळवाणा स्मायली.

हे सर्व काही स्कँडल वाटत नाही पण मन्याच्या मनात याने मोठ्ठे मंथन वगैरे झाले. पहिल्यावेळेला आपण बरोबर वागलो, दुसऱ्या वेळेला अगदीच आदेशाचे उल्लंघन नाही केले, बरोबरच वागलो. आपल्यावर बारीकसा का होईना अन्याय झालाच शिवाय तिसरा नियमपण पाळता येत नव्हता, सगळे फंडे गारद.
पूर्वी अशी काही कॉम्प्लिकेशन्स नव्हती हे जाणवले त्याला. तातडीने त्याने बोध घेतला व पूर्वीसारखे वागू लागला. नंतर एकदा दुसऱ्या घटनेचा त्याने बदलासुध्दा घेतला (पापभिरु- पध्दतीने)

अधेमधे मन्या सेंटी होतो व सगळ्या स्कँडलबाबत चिंतन करुन आढ्याला(नियतीला) प्रश्न विचारतो की, असे का वागावे लोकांनी?
गाण्याचा मूळ अर्थ सोडून गाण्याला आपल्या जीवनाशी रीलेट करण्याची मन्याची जुनी सवय. एक दिवस तो नुसरत आणि एडीची गाणी ऐकत होता.
फेस ऑफ लव्ह लागले, ओळी होत्या -
जिना कैसा प्यार बिना
इस दुनियामें आये हो तो
एक दुजेसे प्यार करो
मन्याला एकदम आठवले. "हो हो, असेच वाटले होते दुसऱ्या घटनेच्या आधी अनऑफिशीयली मदत करताना. काहीही होवो यार, आपण चांगले वागणे सोडून द्यायला नको होते राव"

पण त्यानंतर लगेच द लाँग रोड लागले -
And the wind keeps roaring
And the sky keeps turning gray
And the sun is set
The sun will rise another day...

We all walk the long road. Cannot stay...

लगेच मन्या स्वत:वर खूश झाला. पुढे कधीतरी वागू चांगले, सध्या तरी बरोबरच केले आपण च्यायला, असे म्हणाला. पुढे लाँग रोडच ऐकतच बसला लूपमधे.
**

तात्पर्य/बोध:
कसला आलाय डोंबलाचा बोध, बोर झालो मीच इथे. मागच्या कुत्र्यामांजरीच्या बोधकथा बऱ्या म्हणायची पाळी आली. तरीपण तात्पर्य हे लिहीलेच पाहिजे.

१. सगळ्यांशीच चांगले वागायला गेलात तर आपलेच वाईट होते.
२. संतलोक खरंच संत असतात, एकदा चांगले वागायचे ठरविले की पहिला बोध लक्षात ठेवायचा आणि तरीही चांगलेच वागायचे.

***

5 comments:

आल्हाद said...

आवडला ...
सगळ्यांच्याच हपिसात हे असं होतं का ...
कमी अधिक प्रमाणात !!!

सर्किट said...

masta lihilayesa.
ase "scandals" jase office madhe hotat tasech friends ani relatives madhe hi hotat. tyat pan darveles ashich ekhadi bodhkatha suchun jaate. :-)

Anonymous said...

कथा अतिशय आवडली. ही बोधकथा अत्यंतिक बोधपर आहे, यात मुळी सुध्दा शंका नाही. थोड्याफार फरकाने सारखेच अनुभव गाठीशी आसल्याने, मुळात आपल्याला ’चांगले वागावे’ ही इच्छा होणे हे चूक की बरोबर असा मला आलिकडे काही दिवस प्रश्न पडत आहे!

Yawning Dog said...

प्रतिसादाबद्दल तिघांचाही मी मनापासून आभारी आहे :)
बरे वाटले सगळ्यांच्याच बाबतीत असे होते ते वाचून :D

आल्हाद said...

sailing in the same sinking boat u mean ??
:)