Monday, September 28, 2009

सात विषय

उगाच उठून काहीही निरर्थक खरडणे आता मला बोर झाले आहे, म्हणजे सध्या थोडे दिवस. आता मी एक एक विषय घेवून त्या विषयानुसार लिहिणारे. खालचे सगळे विषय म्हणजे प्रकार वाटतील पण माझ्यासाठी ते विषयच आहेत.

विषय १: वादावादी - ऑफिसमधून घरी जाताना मॉनिटर बंद करणे गरजेचे आहे का?
अ: तू मॉनिटर कधीच बंद करत नाहीस घरी जाताना, करत जा ना बाबा.
ब: मी करणार नाही, इथिकली चूकीचे वाटते मला, माझ्या तत्त्वात बसत नाही.
अ: What? Are you kidding? विसरतो मी, कंटाळा येतो मला वगैरे कारणे ऐकली होती, तत्त्वात बसत नाही? महान आत्म्या, ह्यात काय चूक आहे? उर्जा वाचेल, ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल.
ब: एकतर मूळातच मला उर्जा वाचवणे वगैरे यात काडीचाही रस नाही. आपण उगाच कष्ट घेऊन उर्जा-बिर्जा वाचवा, काही गरज नाहीये, काही क्रायसिस नाहीयेत. बाकी कोणी वाचवत नाहीये इथे काही, F1, लास वेगासचा, मॉल्सचा झगमगाट पाहा.
अ: अरे, सगळ्यांनीच असे म्हणले तर कसे चालेले, दुसरा वाईट काम करतो म्हणून आपणपण करायचे का?
ब: मी काही वाईट करत नाहीये रे मित्रा, बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या, थेंबे थेंबे तळ साचते का खरंच? तुम्हा लोकांना कळत नाही रे, साधे लॉजिक आहे. जर खरेच मोठ्ठा प्रॉब्लेम असता तर मोठ्ठ्या प्रमाणावर जी पेट्रोल आणि उर्जेची नासाडी होते ती बंद झाली असती, नव्हे करायलाच लागली असती. उदाहरणार्थ, मी ईयत्ता चौथीत असल्यापासून ऐकतो आहे पेट्रोल संपणार लवकरच म्हणून, संपले का?
अ: ठीके. मी करत जाईन रोज बंद तुझा मॉनिटर
ब: माझ्या मॉनिटरला हात लावायचे काम नाही, मी करणार उर्जेची नासाडी. काय म्हणणे आहे - काहीही होणार नाहीये, वेळे येईल तेव्हा शास्त्रज्ञ योग्य ते शोध लावतील व सगळे सुरळीत होईल. किंवा असे शोध लागलेही असतील आत्ताच, अमेरीका/युरोप सांगत नाहीत जगाला. हायड्रोजनवर चालणारी कार ७० मधेच तयार होती, फोर्डने दाबले ते संशोधन.
अ: ए भाउ, अमेरीका, युरोप राहूदे, खेडोपाड्यात वीज नसते, त्याचातरी विचार कर.
ब: आपली कंपनी कुठे आहे देशी आहे? देउदेत की पैसे लाईटबिलाचे, इतके लोक थकवितात MSEB चे पैसे, आपल्या कंपनीकडून जरा जास्त जावूदेत. आणि खेडोपाड्याचे फंडे मला नको देवूस, मी खेड्यातलाच आहे. भारतातल्या समस्त सॉफ्ट्वेअर ईंजिनीयर्सनी असले टुकार मॉनिटर बंद करुन वीज वाचवली तर त्यामुळे एका गावात दिवसभरसुध्दा दिवे लागायचे नाहीत. असले काहीतरी सांगून तुम्ही लोक मूळ प्रश्नाकडे दूर्लक्ष करता. खेड्यातल्या वीजेचा प्रश्न सोडविण्यास जादा वीजनिर्मिती पाहिजे. १०० मेगावॅट गरज असताना, ४० मेगावॅट वीज निर्मिती करुन त्यात बचत करण्यापेक्षा, सरळ ११० मेगावॅट वीज निर्माण करणे योग्य.
अ: तू युस्लेस आहेस रे, देशाचे पैसे जातात सबसिडीवर.
ब: देशाचे पैसे कशावर जात नाहीत? शिवाय तुम्हा लोकांसारखे खोट्या बिलांची लफडी नाही करत मी टॅक्स भरताना. जोवर हे बेकायदेशीर नाही तोवर मला माझा मॉनिटर सुरु ठेवण्याचा नक्कीच अधिकार आहे.
अ: नशीब, म्हणजे कायदा झाला असा काही तर तो तरी पाळशील, का त्यावेळी काही नवे कारण?
ब: कायदा होउ नये म्हणून आंदोलन करीन, जीवाचे रान करीन. पण झालाच तर इमानेइतबारे पाळीन, तुम्हां लोकांपेक्षा जास्त कसोशीने पाळीन.
अ: मुद्दामून आडमुठी भूमिका घेतो आहेस यार तू. बाकी राहूदे, निसर्गासाठी तरी कर एवढे निदान.
ब: निसर्गाच्या पोटातूनच कोळसा, क्रूड ऑईल काढतो की आपण. निसर्ग स्वच्छ होतो. गंमत नाहीये, ज्वालामुखीमुळे प्रदूषण होतेच ना? निसर्ग स्वत: किडे करतोच की. राहता राहीला माणसाला होणारा प्रदूषणाचा त्रास तर you deserve it, you know, तुमची लायकीच ती आहे लेको. You know human species is the only species...
अ: साहेब बास्स, आता मानवजातीचा उद्धार नको, नका करु बंद मॉनिटर.
ब: नाहीच करणार मग.

विषय २: लघुकथा
बरेच दिवस एक लघुकथा लिहायची होती, लघु म्हणजे लघुच अगदी, ३-४ परिच्छेदात संपणारी. जमत नाही म्हणून काय झाले, प्रयत्न केले पाहिजेत हो माणसाने, ब्लॉग लिहायला काय पैसे पडतात का?
गोष्टीचे नाव: रघूचे पातेले - वरवर साधी वाटणारी पण लहान मुलांच्या निरागस भावविश्वाचे चित्रण करणारी छोटीशी अतिफालतू गोष्ट.
एका दुपारी(उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे) रघू घरी एकटाच असतो, त्याची आई भिशीला गेली असते. तेव्हा शेजारच्या काकू येतात(त्या भिशीत नसतात) आणि रघूला विरजणाला थेंबभर ताक* मागतात. रघू दानशूर आणि नको तिथे डोके चालविणारा. तो म्हणतो काकूंना, "हे छोटे भांडेच घ्या". काकूंना ते भांडे बघून वाटते की मागच्या वेळी आपण वाटली डाळ घालून दिलेले भांडे ते हेच. [रघूच्या आईच्या मते, वाटली डाळ दिलेले भांडे तिने गोळ्याच्या आमटीच्यावेळी परत केले आहे आधीच].
तीनचार दिवसांनंतर रघूची आई, काकूंकडे विरजणाचे भांडे परत मागायाला जाते तेव्हा काकू म्हणतात, "कुठलं भांड वहिनी? माझ्याच भांड्यातून विरजण घेउन गेले मी, म्हणला नाही का रघू?"
"रघू तर म्हणाला, आमच्या भांड्यातूनच दिले त्याने" - रघूची आई.
"हाहा, तुमचा रघू तसा वात्रटच आहे हां, गंमत केली असेल त्याने तुमची, लहान मुले आणि त्यांच्या थापा एकेक" - काकू.
रघूची आई विषय बदलते आणि भाजीमंडईचे काहीतरी बोलून परत जाते घरी. रघू खूप गोष्टीवेल्हाळ असतो आणि गोष्टी सांगायच्या नादात कधीकधी काहीही थापा मारत असतो. शिवाय "रघू ना आमचा. काहीतरी बोलतो, लहान मुले आणि त्यांच्या थापा एकेक" हे वाक्य रघूच्या आईने पूर्ण बिल्डिंगभर केले होते. यावेळी त्याने थाप मारली नाही हे तिला माहित असते त्यामुळे घरी गेल्यावर रघूच्या आईची जाम चिडचिड होते.
नंतर एकदा रघूचे आणि शेजारच्या पमीचे कडाक्याचे भांडण होते तेंव्हा रघू पमीची वेणी ओढतो. पमी हिसका देवून पळून जाते आणि जाताना ओरडते, "थापाड्या तो थापाड्या, आणि वर मुलींचे केस ओढतो". रघू चक्रावतोच. दोघांची दोन तीन तासांनी परत बट्टी झाल्यावर तो पमीला मगाशी थापाड्या का म्हणालीस ते विचारतो. मग त्याला कळते की काकूंनी भांडे परत दिलेच नाही, पण त्याला जास्त राग काकूंनी त्याला थापाड्या म्हंटल्याचा येतो. तो लक्षातच ठेवतो काकूंचे वागणे.
एक दिवस पेपरवाला पेपरचे बिल घ्यायला येतो तेव्हा पमीचे बाबा त्याला उद्या ये म्हणतात. पुढे पेपरवाला रघूच्या घरी येतो. तो येवून गेल्यावर रघू पमीला सांगतो की, "पेपरवाले काका म्हणाले की तुम्ही कधी वेळेवर पैसे देत नाही, पेपर मात्र रोज सहाला पाहिजे". हे कळाल्यावर पमीची आई पेपरवाल्याशी कडाक्याचे भांडते. थोड्या वेळाने काकू आणि पमीबरोबर गॅसचा नंबर लावायला जाताना रघू सांगतो की त्याने थाप मारली होती. पेपरवाले काका असे काही म्हणालेच नव्हते. मोठेपणी रघू पमीच्या धाकट्या बहिणीशी लव्ह मॅरेज करतो.
*विरजणाला दूध आणि ताक दोन्ही लागते परंतु ताक कमी लागते असे काहीतरी आहे, ताक चुकीचे असले तर - तर काय? चूक तर चूक पण शेवट ताक, दही, लोणी सगळे दूग्धजन्यच.
**निरागस भावविश्वाची कथा लिहीता लिहीता चुकून सूडकथाच झाली.

विषय ३: नाटक
पास.

विषय ४: भावनिक लेखन
मला बरेच दिवस झाले काहीतरी भावनिक लिहायचे आहे. इतके प्रामाणिकपणे भावनिक लिहायचे आहे की मी मगासच्या वाक्यात मला ‘सेंटी’ लिहायचे आहे असे नाही म्हणालो. आत्ता मागचे पोस्ट आठवले त्यात पण असेच मला भावनिक विचार करायचा होता पण जमले नाही. नातेसंबंधांवर नेहमी भावनिक सुचते लोकांना. मला नाही सुचले पण. मी विचार करायला लागलो तर मला खालील ओळी सुचल्या, ज्या कुठल्याही अँगलनी भावनिक निघाल्या नाहीत -
"मित्र निवडता येतात, नातेवाईक नाही. नातेवाईक निवडता आले असते तरी आम्ही निवडले नसते. नातेवाईकांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात - आईकडचे नातेवाईक आणि बाबांकडचे नातेवाईक. कधी कधी काहीतरी दूरदूरचे नाते लागून सामाईक नातेवाईकपण असतात. पण अशा सामाईक नातेवाईकांचेसुद्धा नकळत आईकडचे किंवा बाबांकडचे असे वर्गीकरण होते(दोन्हीबाजूच्या नात्यांच्या लांबीनुसार). लहानपणी नातेवाईकांना भेटायण्यासाठी सुट्ट्यांचा(Holidays holidays, चिल्लर नव्हे) वापर व्हायचा. माणूस जसे मोठे होतो तसतसे त्याच्यामागचे उपद्व्याप वाढत जातात आणि नात्यांची वीणपण क्षीण होते जाते"
नातेसंबंध कॅन्सल.
-
निवडुंगाच्या काट्यात अडकून राहीला होता तो पावसाचा थेंब एकटाच. सर ओसरुन गेली. ढग आपल्या वाटेने निघून गेले, पुढे कुठेतरी आपली काळी गोठडी रिकामे करतील, न करतील. सगळे थेंब जमिनीत जिरुन निर्माण झालेला मृद्‌गंधपण आता ओसरु लागला होता. एखाद्‌दुसरा झाडाच्या पानांवर रेंगाळणारा थेंबसुद्धा आता मातीच्या मायेला भुलून गेला होता. पूर्ण परिसरात एकच निवडुंग होते ते आणि त्याच्या अगणित काट्यांमधल्या एका काट्यावरचा तो एक थंब. तो काटाही इतरांसारखाच पांढरट टोकदार, विशेष काही फरक नाही. थेंबही इतर पावसाच्या थेंबांसारखाच पारदर्शक, सभोवतालचे प्रतिबिंब म्हणजे स्वत:चे अस्तित्व समजणारा. इतरांना टोचणारा तो काटा या थेंबासाठी मात्र नाजूक झोका होता. काट्यासाठी तो थेंब काय होता? कित्येक जलबिंदू त्याला ओलावून गेले. सगळे निरीच्छेनेच त्याच्यावर बरसले, "मलापण लांबरुंद पिंपळाच्या पानावरुन घसरून मातीत झेपावायला मिळाले असते तर, पण आमच्या नशिबी हा काटा" असे म्हणत म्हणत, कर्तव्य म्हणोन काट्याला ओले करत गेले. पण हा मात्र झोके घेतोय ! प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की, आईच्ची जय, काय रद्दडे. संपले भावनिक.

विषय ५: भाषांतर
भाषांतर म्हणजे एका भाषेची वाट लावतो ती पुरेशी न वाटल्याने अजून एक भाषा आपल्या सुमार बुद्धिमत्तेच्या दावणीला बांधायची.
मला Led Zepppelin चे टँजरीन गाणे भयानक आवडते त्याचा स्वैर अनुवाद टाकू आपण.



Measuring a summers day,

I only finds it slips away to grey,

The hours, they bring me pain.

*Tangerine, tangerine,

Living reflection from a dream;

I was her love, she was my queen,

And now a thousand years between.

Thinking how it used to be,

Does she still remember

times like these?

To think of us again?

And I do



ग्रीष्मातले रुक्ष दिवस
कंठण्यातला फोलपणा,
संथ क्षण अन्‌ स्तब्ध निमिषे
वेदनांची केवळ निमित्ते

टॅंजरीन, टॅंजरीन...
हळव्या गोड स्वप्नांचा,
छोटासाच कवडसा
पण आभास चेतनांचा

होती माझी स्वामिनी
अन्‌ मी तिचा श्वास,
आता अंतरलली मने
अन् आठवणी खग्रास

व्याकुळते का तीपण
त्या ग्रीष्मआठवणींनी ?
आठवतात का अजूनही
तिला माझ्या उ:श्वासछाया ?

**
विषय ६: दीर्घकथा
पास. दुसरा पास झाला हा. पास नावाची गोष्ट किवा नाटक लिहिले पाहिजे एकदा.

विषय ७: निरर्थकपणा
खरे तर वरील सर्व निरर्थकपणाच आहे त्यामुळे वेगळे लिहीण्यात काही पॉईंट नाही पण आता शीर्षक टाकलेच आहे तर लिही चार ओळी. समोर एक गाणे चालू आहे vh1वर. काही मनात येईल ते दाखवितात ईंग्लिश गाण्यांच्या व्हिडिओजमधे. एक माणूस रस्त्याकडेला उभा होता त्याने आकाशाकडे पाहिले आणि मग डायरेक्ट वाळवंटात जाउन नाचू गाउ लागला. काहीतरी अर्थ असेल म्हणा पण मला काही झेपला नाही. एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, बाकी जवळजवळ सर्व धर्मात माणसाला पुरतात(मेल्यावर), पारश्यांच्यात विहिरीत टाकतात (का असे च काहीतरी). फक्त हिंदूंच्यातच जाळतात. परवा फार्मव्हिला खेळताना मला उत्तर सापडले - हिंदूंचा समाज पूर्वापारपासून कृषिप्रधान आहे, बाकीचे नव्हते एवढी शेती करत. आपल्याकडे पुरले आणि नंतर कोणीतरी नांगरताना घोळ झाला म्हणजे बसा. म्हणजे बाकीपण काही शास्त्रीय कारणे असतील पण हेसुद्धा असायला पाहिजे. इन्ग्लोरियस बास्टर्डस भन्नाट आहे, मला अचंबा वाटतो की माणसं दहा-दहा वर्ष विषय डोक्यात ठेवून सिनेमा बनवतात. मला गेले पाच वर्ष झाले पाचसहा जेनेरीक युटीलीटी प्रोग्रॅम्स लिहायचे आहेत, एका आठवड्याच्या वर नाही लागणार वेळ त्यांना, पण अजून मुहूर्त नाही लागला माझ्याच्याने. दरवेळेला काहीतरी नवीनच खुस्पट निघते, मधे मधे मी वेड्यासारखे सिनेमे बघायचो, मग नंतर फार्मव्हिलाचा नाद लागला आता परत सिनेमे. ओबामा टीव्हीवर काहीतरी बोलतो आहे. हा मनुष्य कशावरही सगळे माहित असल्यासारखे बोलतो राव. एक नंबर बोलबच्चन. उद्या त्याला कुणी विचारले -Sun चे UNIX Servers, आमच्या कंपनीने काढून त्याऐवजी HP चे घेतले हे योग्य वाटते का? तर तो दहापानी उत्तर दईल. बरेच जण असतात तसे, कशावरही मत व्यक्त करु शकतात. मीपण तसाच आहे म्हणा. २०१२ पिक्चरचे ट्रेलर पाहिल्यापासून मला दिवसरात्र जग खरेच संपले तर काय मज्जा येईल असे विचार येत आहेत. हॉलिवूडवालेपण लेकाचे मागेच लागले असतात, येनेकेनमार्गाने त्यांना संकट आणायचेच असते आणि काहीतरी भयंकर उपाय त्याच्यावर. उद्या एखादे असे मोठे संकट आले तर शास्त्रज्ञांकडे जाण्यापेक्षा सर्वप्रथम हॉलिवूडमधल्या दहा डायरेक्टरांना फोन लावावेत, भारी उपाय सापडतील. आत्ता असले काही सुचते आहे, तेव्हा फाटेल. बास करावे, बोर झाले.

***

17 comments:

Abhijit Bathe said...

YD - सही लिहिलायस लेख. पर्टिक्युलरली "भावनिक" मध्ये "निवडुंगाचे काटे..." वगैरे प्रकार तर ’वाचवला नाही’ एवढा ’चांगला’ झालाय!

काही जनता हाच भावनिक प्रकार आणखी पीळ मारुन लिहिते. त्यांचा मला वैताग येतो. लघुकथा आवडली. वादावादी मधल्या ब ची कारणं फंडु आहेत. सही लिहितोयस. लगे रहो!

Bhagyashree said...

jabari re!!
bhavnik kharach vachvla gela nahi! :D
vadavadi byesht!
nirarthak , ekdam perfect..
laghukatha , mala nav jast awdle! raghuche patele? kay pan rav.. :D

भानस said...

सातही प्रकार एकदम इस्टाईल में हाताळले आहेस.
वादावादी आवडली. नडणे एकदम भारी झालेय. जशेच्या तशे.
लघुकथा, ठीक ( हा ठी ना लांबवून म्हटलाय रे )आहे. यापेक्षा चांगली लिहू शकला असतास ना. नेक्स्ट टाईम.
भाषांतरातले " अन आठवणी खग्रास पर्फेक्ट-त्या भावाशी."
माणूस जसे मोठे होतो तसतसे त्याच्यामागचे उपद्व्याप वाढत जातात आणि नात्यांची वीणपण क्षीण होते जाते"
नातेसंबंध कॅन्सल.
-खरे आहे. आजकाल असेच झालेय. आता हे वाईट का चांगलेच आहे हे प्रसंगानुरूप बदलतेय त्याचा जास्ती ताप झालाय बघ. आपणही बदललोच आहोत तेव्हा दोष पहिला स्वत:ला द्यायला हवा,:(
निरर्थकपणा लिहीताना इतके विचार सैरावैरा पळत होते की काय,:D.

Aparna said...

भन्नाट.. वादावादी आणि भावनिक एकदम जबरी :)

Maithili said...

BHAVANIK lihit ja dada. pharach changale zale aahe. he asle themb aani nivdung vale likhan sudhha tu karu shakatos he pahilyandach kalale.
baki tu ek mahan vibhuti aahes tyamule tu vattel te lihu shakatos yabaddal dumat naahi.

Raj said...

masta re :D
tujhya Dokyat itakya kalpana kasha yetata mahit nahi. lihit raha bhau, thambu nakos!

unique Creative said...

उर्जा संपली तर ब्लॉग कसा लिहिणार भाउ तुम्ही

Mugdha said...

भावनिक वाचतांना "कंटाळा" आला..स्पेशली "निवडुंग" पार्ट!!
तू लिहिलेले "पासेस" मात्र मस्तंच आहेत..
बाकी सगळे तू म्हणतोस तस्सेच निरर्थक :p

मुग्धा

Pranav Jawale said...

sahi !

Anonymous said...

:) Good One!

"FarmVille" : Me too!
Vait naad aahe.

Unknown said...

Kahi lines mast jamalya ahet !!
te bhavanik matra pakala thoda :-)

Dk said...

sahiyeee ;)7 paikee 2 paasCh keles pan tareehee :D :D

mala bhaashaantr awdle :)

Jaswandi said...

sahich ahe he!
Raghu n Pami bharee ahe :)
vadaavaadi pan sahiye..swair anuvaad kahichya kahi (changlya arthane) ahe..

baki sagala pan "bara" ahe :P

Dhananjay said...

too good!

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

kitti divsanni bhannat comeback kelyas tu...solid fresh jhale mi waachun. BTW tangarine cha anuwad sunder hota. ajibat nirarthak navhta.

Serendipity said...

agadi apaghatanech wachala mi ha blog!!!
pan bar zal...sagal arthapurn wachun hairan zale hote...
dis meaninglessness makes more sense...

Priyaranjan Anand Marathe said...

Awesome.