Sunday, November 26, 2017

साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स

साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स.

म्हणजे एखाद्याला मदत करायला जावे आणि त्या मदतीमुळेच त्या व्यक्तीची अडचण व्हावी. काल एकाला मी जोरात सांगितलं - "ओ, साईड-स्टॅंड लागलय". हे गेले कित्येक वर्षं, मी अनेकांना सांगितलं आहे, आणि त्यांचा-त्यांचा जीव वाचवला आहे. तू आजपर्यंत काय काय समाजसेवा केली आहेस असे कुठल्या फॉर्मवर विचारले तर -
१. लोक गाडीवरुन जाताना त्यांचे साईड-स्टॅंड लागले असले तर त्यांना तसे सांगून वाचवले आहे
२. लोक गाडीवरुन जाताना गाडीचा दिवा लागला असेल तर (म्हणजे सकाळी, दुपारी) तर त्यांना तसे सांगितले आहे.
काल ज्या मनुष्याला सांगितले, तो मनुष्य मी हे सांगेपर्यंत शिस्तीत जात होता. माझ्या बोलण्याने त्याचे लक्ष विचलीत झाले आणि धाप्पकन पडला, त्याच्यावर ती बुलेट - माझ्याकडे रागाने बघायच्या आतच मी पोबारा केला. अवघड आहे यार. त्या क्षणीच मला मास्टर शिफू  आठवला कुंगफू-पांडामधला. तायलॉंग सुटू नये म्हणून सिक्युरीटी टाईट करा असा निरोप्या पाठवला आणि त्याच्यामुळेच तायलॉंग सुटला. 
मग मला वाटले ते खालीलप्रमाणे - अगदी याच क्रमाने असेच वाटले:
१. सेल्फ फुलफिलींग प्रॉफसी हा प्रकार आहे तसेच झाले आत्ता.
२. सेल्फ फुलफिलींग प्रॉफसीला मराठीत काय म्हणत असतील - असा विचार करावा लागतोच ही लाज नाही का? आई काय म्हणेल?
३. स्वकारक भाकीत वगैरे काहीतरी म्हणत असतील.
४. पण आपल्यामुळे घडलेल्या या प्रकाराला काहितरी वेगळे नाव दिलेच पाहिजे.
५. साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स म्हणूया - एखाद्याचे वाईट होवू नये म्हणून आपण जी क्रिया करतो त्यामुळेच त्या व्यक्तीचे नुकसान होणे.
६. असे प्रसंग सामाजिक जीवनात आल्यास, आपण आता म्हणायचे - अरे, हा तर साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स. हळू हळू लोकांना वाटेल खरंच असं काहीतरी असेल. अगदीच विकीवर जावून तपासणारे असे कितीसे असणार. त्यांना, विकीवर काय सगळं असतं का? स्पेलींग चुकलं असेल, अरे सायंटिफीक जार्गनमधे वेगळं नाव आहे, असे काहीतरी सांगून कटवू.
*

खरंतर, त्या माणसाने मला किती शिव्या घातल्या असतील. त्याचंही बरोबर आहे - कदाचित मी त्याचं लक्ष विचलीत केलं नसतं तर तो पडला नसता. माझही काही चूक नाहिये तसं बघायला गेलं तर - साईड-स्टॅंड मिटलं नसेल तर गाडी वळवताना पडलेले असे असंख्य लोक पाहिले आहेत मी, त्यामुळे मी असं सांगतो लोकांना. (शिवाय समजा त्या मनुष्याला एखाद्या ओळखीच्या माणसाने हाक मारली असती तर लक्ष विचलीत होवून तो पडला असता ना? गाडी चालवताना सतर्क राहायला नको का?)
दोघांचही बरोबर. 
असं आजकाल खूप व्हायला लागलं आहे - दोन्ही बाजूंचं बरोबर पण तणातणी. तण उपटणं भयानक अवघड आणि शक्तीचं कामं असतं. म्हणजे दोन्ही बाजूंचे मुद्दे बळकट असतात, पण ते एकत्र मांडले की भांडण/विवाद होतात. मला आताशा हे दुपारचं ऊन चढू लागलं आहे.
मनुष्याचं वय वाढलं की त्याचे विचार जास्त ॲब्स्ट्रॅक्ट व्हायला लागतात. 
दोन्ही बाजूंचे पटायाला लागल्यावर विजयी कोण हे कसं ठरवायचं यावर मी बरेच दिवस विचार केला मग सोल्यूशन मिळालं मला. प्रत्येकाचं सोल्यूशन वेगळं असतं ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार. मी ठरवलं आहे की, दोन बाजूचे लोक भांडत असले की, जो सगळ्यात कमी आक्रस्ताळेपणा करले तो जिंकला. 
लोकांच्या मनातली आक्रस्ताळेपणाची व्याख्या आणि माझ्यामनातली आक्रस्ताळेपणाची व्याख्या ही वेगळी असणार. म्हणजे कमालीची वेगळी म्हणावी इतपत वेगळी असणार. काही लोक बौद्धिक हिरो बनून सर्वसामान्य निरीक्षणातून जे समजते त्याबाबत प्रश्न उभे करतात मग समोरच्याचे ततपप झाले की, हे एक मंदस्मित देणार. स्मर्क म्हणतात तसे. याच पॉईंटला मला अनेकदा, हिंसा हा पर्याय असूच शकत नाही हे म्हणणे पटत नाही. अशावेळेला स्मर्कधारी स्त्री/पुरुषाच्या सण्णकन कानाखाली हाणावी असे वाटते. तुझे मुद्दे बरोबर असले तरी असे मांडतात का? तू दुसर्‍याला बोलण्यात हरवू शकतोस ना? मग हे घे, आता मारण्यात हरवून दाखव. एका लिमीटनंतर चर्चेने वाद सोडवा वगैरे म्हणणारे लोक मला फ्रॉड वाटतात. का चर्चेने? तुम्हाला ती चांगली जमते म्हणून का? आम्हाला हाणामारी चांगली जमते, आम्ही हाणामारीने सोडवू. एक डिस्क्लेमर म्हणजे मला चर्चा वा मारामारी दोन्ही नीट जमत नाही. एककाळ मारामारी बरी जमायची. खूप हुशार लोक जेव्हा माज करतात तेव्हा मला राग येतो. इन जनरल माजुर्ड्यांचाच मला राग येतो. 
मानसोपचारतज्ञाकडे जायची गरज नाही कारण मला आधीच माहीत आहे की, या अतीव रागाचे मूळ माझ्या लहानपणी अशी काहीतरी एक माजरिलेटेड घटना घडली आहे त्यात आहे.
मी लहानपणी एका समवयीन भावाबरोबर बुद्धिबळ खेळायचो - या मनुष्याबरोबर डाव नेहमी ड्रॉ व्हायचा, कधी कुणी जिंकले तर मीच जिंकायचो. मी जिंकल्यावर पटकन विषय बदलून (म्हणजे कुठला विषय चालू नसायचाच त्यामुळे विषय घालून म्हणले तरी चालेल) हवापाण्याच्या गप्पा मारायचो, याला वाईट वाटू नये म्हणून. एकदा हा सद्गृहस्थ माझ्याविरुद्ध जिंकला आणि त्याचा तो जल्लोष म्हणजे अशक्यच, मी विसरूच शकत नाही. म्हणजे कधीही जल्लोष शब्द वाचला की मला तो प्रसंगच आठवतो. 
तर ह्याचा परीणाम म्हणून मी कायमचा माजविरोधी बनलो आहे. मला शेरलॉक, हाऊस वगैरे मंडळी आवडली तरी माझे पहिले प्रेम मिस मार्पल याच आहेत.
(
कधीकाळी मी कोणा सिरियल किलरचा पिक्चर काढला तर आमचा किलर सगळ्या माजुर्ड्या लोकांना मारणारा असेल. त्याला शोधणारा डिटेक्टीव्ह एकदम नम्र पण ठाम, निष्ठावंत वगैरे. त्यामुळे किलरला डिटेक्टीव्हविषयी सहानुभूती असेल. पण या सगळ्यात एक लुडबूड करणारा चांगला पण माजुर्डा पत्रकार असणार. क्लायमॅक्सच्या आधी डिटेक्टीव्हला कळणार की, अर्रे यार, हा किलर आता पत्रकारालाच मारणारे. मग क्लायमॅक्स म्हणजे अगदी - किलर पत्रकाराला गोळी घालणार तेवढ्यात डिटेक्टीव्ह बाबापुता करत किलरला समजावणार की, असे नको करुस. तू स्वत: कसा चांगला आहेस पण तेवढी एक लोकांना मारण्याचीच सवय वाईट आहे ना तुझी? तसे हे माजुर्डे लोक पण चांगलेच असतात फक्त माज करायचीच सवय वाईट असते, इग्नोर करायला शीक त्यांना. मग किलर म्हणेल - हाहाहा, तुला काय वाटलं, तुझ्या लेक्चरने मी सुधारेन, अज्जिबात नाही. हा मारतो बघ याला. तेवढ्यात परत हाहाहा - यावेळी डिटेक्टीव्ह. तो म्हणेल - बघ एकदा आरशात स्वत:कडे. (म्हणजे व्हर्च्युअल आरसा, एखाद्याचे मन कसे आहे ते दाखवणारा, शरीर नव्हे.) बघ एकदा आरशात, माजुर्ड्यांना मारता-मारता तुला पण असा माज झालाय की - तू म्हणशील तेच खरं, तुझी समजूत कोणीच काढू शकत नाही. ओमायगॉड, किलरच्या डोळ्यात सेल्फ रिअलायजेशन दिसेल आणि तरीपण तो पत्रकारावर बंदूक रोखेल पण ऐनवेळी स्वत:च्या डोक्यात गोळी मारणार. संपूर्ण पिक्चरमधे कधीतरी हा सिरियल किलर का असा किलर झाला हे दाखवायचे, करुण प्रसंग, बासरीच्या म्युझिकमधे. मग शेवट त्याने आत्महत्या केली की त्याचे उदात्तीकरण सुफळ-संपूर्ण.

मी असा पिक्चर काढणार नाहीये. जर असा किलर अस्तित्वात असेल, आला, येणार असेल तर ती माझी आयडीया नाही. हे सर्व काल्पनिक आहे. खून करू नका. 
)

तर तसं असतयं हो बरेचदा. शब्दप्रभू लोक चर्चेसमधे (चर्चाचे प्लुरल) एखादा कळीचा मुद्दा मांडतात आणि मग विजयीमत्त भाव धारण करतात. एकेकाला फोडला पाहिजे ओल्या वेताने. (अजून एक डिस्क्लेमर: मी ॲक्च्युअल वेताने फटके खाल्ले आहेत. ओल्या नाही. तरीपण हे वाक्य - I deserve to write.)
गेला काही वेळ मी फारच प्रो-हिंसा लिहीत आहे. मी काय असा on the edge वगैरे नाहिये. पण वाटतं ना राव एकेकदा. आपलंपण मत आहे. आणि तात्कालिक आहे, बदलेल कदाचित.

मला बरेचदा असंपण वाटतं की, मला जे वाटतयं ते अजून कुणालातरी वाटत असेल. हे तर अतिअमहाफालतू आहे, मेन पॉईंट हा आहे की - माझ्यासारखी जडणघडण असलेला एखादा असेल त्याला पण अगदी याक्षणीच नव्हे पण साधारण वर्तमानकाळात अशाच प्रकारचे विचार मनात येत असतील की. आणि असे बरेच लोक असतील. आपल्याला नाही का मिटींगमधे वाटते - ही भारी कमेंट टाकावी, लोकं इम्प्रेस/गारद होतील, पण आपण भीडेखातर तसे करत नाही. नंतर कधीकधी दुसरं कुणीतरी करतं आणि त्या मनुष्याचं कौतुक होतं. असं बरेचदा झाल्यावर एखादवेळेला आपण हिय्या करून अशी कमेंट टाकतो आणि जनता इंप्रेस होतच नाही.
*

साईड-स्टॅंडवरून कुठे आलो आपण. साईड-स्टॅंड पॅरॉडॉक्स लक्षात ठेवा.
***

Tuesday, August 15, 2017

जय फ्लेक्स.

कुणालाही काहीही आवडू शकतं, लोकांना बेकायदेशीर गोष्टीपण आवडतात. मलाही कधीतरी काही बेकायदेशीर गोष्टी पटतात. काही गोष्टींबाबत विरुद्ध विचारसरणीच्या लोकांचे एकमत होते आणि मी फारच यडा ठरतो.
असं झालं की ब्लॉग हा एकच पर्याय आहे.

मला कायदेशीर-बेकायदेशीररीत्या लावलेले फ्लेक्सबोर्ड आवडतात. आणि त्यामुळे झालेलं शहराचं विद्रुपीकरण, सो कॉल्ड विद्रुपीकरण भयंकर आवडत. (मला सो कॉल्ड शब्दरचना वापरण अज्जिब्बात आवडत नाही, पण मला फ्लेक्सबोर्डीय विद्रुपीकरण - हे विद्रुपीकरण नाहीये हे सांगण जास्त महत्वाचं वाटतं त्यामुळे, मनावर दगड ठेवून सो कॉल्ड शब्द वापरला. कळण्याएवढा मोठा झालो आहे तेव्हापासून आजतागायत मी सो कॉल्ड असे उच्चारले नाहीये. आज लिहीला, बहुधा पहिल्यांदाच.)

अपरिहार्य कारणांमुळे फ्लेक्सबोर्ड विषयातून मधेच छोटासा ब्रेक घ्यायला लागतोय.

कुणालाही काहीही आवडू शकतं व ते जमू शकतं पण ज्यांच्या आवडीनिवडी बहुतमतीय असतात त्यांची चंगळ असते. उदाहरणार्थ गाणे येणारे. सगळे लोक जमले - स्नेही, नातेवाईक टाईप की, गाणं येणारे लोक, गाण्याकडे चर्चा वळवतात. वळवतात काय कधीकधी तर हॅंडब्रेक मारुन, अक्षरश: यू टर्न मारुन चर्चा गाण्यावर आणणार. काय अर्थ आहे का यार? आम्ही ऐकू ना रेडीओ, सीडी, फोनवर गाणी, आम्हाला हवी ती. एवढं रियाजबियाज, मेहनत करुन मग, ज्यांना म्युझिक कंपनीने सिलेक्ट केलयं त्यांची ऐकू ना. जेवायला बोलावलयं तर खायला द्या ना. मग लोकं म्हणणार - हां अरे, ते गा ना, ते तुला फार छान जमतं. मग हे गणू लोक - हो हो बरेच दिवस झाले आता, जमतयं का नाही वगैरे हंबल कमेंट करुन, स्वत:चीच कमेंट पूर्ण करायच्या आत ते गाणे सुरु करतात. अशी यांची n गाणी होतात. मग लांबड संपते.
आम्ही म्हणतो का, आम्हाला कोडींग फार छान जमतं. आम्हाला कुणी करतं का फर्माईशी - वा वा काय सुंदर कोड झाला हा...अरे तुला मल्टीथ्रेडींग छान येतं, एखादं काउंटडावून लॅच लिहून दाखव ना, नाहीतर नको - सायक्लिक बॅरिअर लिही. होतं का असं? आईच्ची कटकट.
जर कुणाला वाटत असेल की लोकांचे कौतुक केले तर याच्या पोटात दुखते. ते तर आहेच हो. पण त्याहून जास्त त्रास म्हणजे, बोर किती होतं यार इतरांना, सगळे गाणेरडे लोकं पकडून करा ना मैफिल तुमची.  शिवाय आमच्या आवडीनिवडीचं काही आहे का नाही? आजच्या प्रोग्रेसिव्ह भाषेत, आमची कुणाला काही पडलीय का नाही? हा हा हा. कॉमेडीशोवाले असेच हसतात. स्वत:च.
ब्रेक संपला आहे.

मला आजतागायत फ्लेक्सबोर्ड याविषयी सिरीयसली चांगलं बोलणारं कुणी भेटलं नाहीये. उपहासाने वगैरे लोक छान बोलतात पण सगळ्या पार्टीचे, विचारसरणीचे लोक मिळून शिव्याच घालतात. 
खरेतर लोकांनी, किंवा नेत्यांनी विविध कार्यक्रमांनिमित्त फ्लेक्सबोर्ड लावले तर काय प्रॉब्लेम आहे? शहर विद्रुप होते म्हणे? जाता येता शंभर ठिकाणी, मधेच बच्चन, हृतिक, असंख्य नट्या, विशेषत: दागिन्यांच्या जाहिराती करणार्‍या नट्या यांचे भलेमोठे बॅनर बघताना नाही का वाटत की शहर विद्रुप होते याने? (वाटत असेल तर मग हे वेगळं पब्लिक आहे, त्यांच्याशी माझा वाद नाही. त्यांच्याशी वेगळी चर्चा करावी लागेल. ते एखाद्याला फाशी देवू नका कारण मूळात फाशीची शिक्षाच चुकिची आहे म्हणणारे असतात ना तसला वर्ग असेल हा). 
जनरल जनतेला असले मेकप केलेल्या सेलिब्रिटींचे फ्लेक्सबोर्ड चालतात. पण एखाद्या गल्लीत चार जणांच्या ग्रुपने गॉगल बिगल घालून टेचात फोटो काढून एखाद्याचे अभिष्टचिंतन करणारे बोर्ड लावले की मात्र विद्रुपीकरण? इनमिन १५ दिवस असतात ते बोर्ड, नंतर निघतात. शिवाय त्या बोर्डवरच्या एखाद्याच्या गळ्यात सोन्याचे दागिनेबिगिने असले की, अजून चेकाळतात लोक - काय तो अवतार केलाय, काय ते संपत्तीचे हिडीच प्रदर्शन वगैरे. मी एक टू-व्हिलीर-वालाली पाहिले आहेत - फातिमानगरच्या सिग्नलच्या अलिकडे असेच पोरांनी एका मित्राच्या वाढदिवसाबद्दल बॅनर लावले होते, त्यात सोने घालून उत्सवमूर्तीचा कुत्र्याबरोबर फोटो होता. टू-व्हिलीरवाली बाई म्हणाली - शी काय हे बॅनर लावलंय, काय ते वेड्यासारखं घातलं आहे आणि अंगात. पुढे सिग्नलला हीच ललना म्हणाली, जेनेलिया काय सुंदर मराठमोळी दिसते ना, त्या अष्टेकरांच्या जाहिरातीच्या बॅनरवर. ( बहुधा अष्टेकर असावेत, कोणीतरी होते सराफ - अशोक सोडून). असं कसंकाय राव? कमॉन.
आणि अशा छोट्यामोठ्या बॅनरवर यमक काय सुंदर असतात, त्याच्याबद्दल तर कोणीच कौतुक करत नाही. खाली खडबडीत रस्ता, पण चिटुकल्या बॅनरने यांचे शहर विद्रुप होते. 

हे सगळं सारकॅस्टीक नाहीये.

झालं माझ्या मनातलं सगळं बोलून. मळभ दूर झालय. धन्यवाद.

Friday, July 21, 2017

दळण


हे एक दळणीय पोस्ट होणारे याची मला चांगलीच कल्पना आहे. पण आपल्याला काय वाटेल ते लिहावे, मग ते दळ/वणीय होवो नाहीतर, जीएड होवो, जास्त विचार करू नये. पर्वा नै. फेसबूकवरील कोटनुसार जगावे<एकच जीवन मिळते, ते कुणा दुसर्‍यासारखे जगून वाया घालवू नका वगैरे>. मागच्या वर्षी म्हैसूरला टॅक्सी केलेली आजूबाजूला फिरायला. टॅक्सीवाला एक कॅरॅक्टर होता. त्याला असूदे, काय हरकत नाही वगैरे म्हणायचं असलं तर तो म्हणायचा पर्वा नै. आपल्याला जेवायला जरा उशीर होईल - पर्वा नै. पाउस आलाय आजचा सगळा ठरलेला कार्यक्रम होईल का - पर्वा नै. भारी होती त्याची स्टाईल.
तर.
बालपणापासून मी काही गोष्टीत एक्स्पर्ट आहे. खरेतर एक्स्पर्ट शब्दासाठी असलेले बर्‍यापैकी सर्व समानार्थी मराठी शब्द मला तोंडपाठ आहेत - निष्णात, पारंगत, पटाईत, निपुण, वाकबगार, सराईत, प्रवीण. पण अडचण अशी आहे की, मला ते सर्वच समसमान आवडतात त्यामुळे त्यातला कुणाला वापरले तर उरलेल्यांना वाईट वाटणार.
मी दळण आणण्यात प्रचंड भारी आहे. लहानपणापासून. मला सातवीत नवीन सायकल आणली होती, आणि त्यावरून केलेले पहिले काम म्हणजे दळण आणणे. येताना मी सायकल गिरणीच्या बाहेर विसरलो पण दळण नाही विसरलो. मग घरी आल्यावर आईने सायकल कुठाय विचारल्यावर डोक्यात प्रकाश पडला. सायकल परत आणायला जाताना आईने अजून नवीन एक काहीतरी गिरणीत टाकायला दिले. अशारितीने मला रिकर्शन,  फॉर लूपचे, कुमारकडूच मिळाले आहे. रिकर्शन का रिकर्षन?  रिकर्षन ब्राह्मणी शब्द, रिकरसन उत्तरेतला शब्द वाटतो, रिकर्श्नन जैन शब्द वाटतो. 
दळण टाकण्यात आणि ते आणण्यात एक्स्पर्ट असण्यासारखं काय आहे असे मूढसामान्यांना वाटणे साहजिकच आहे. बर्‍याच बारीक गोष्टी असतात. 
आपल्याला हवे तसे (म्हणजे घरातून सांगण्यात आले आहे तसे) दळण पाहिजे असल्यास ह्युमन नेचरचा अभ्यास खूप गरजेचा आहे. अगदी जरुरी शब्द वापरण्याइतका. समजा तुम्हाला सांगितले आहे बारीक दळण आण तर गिरणीत जावून शंभरदा सांगायला लागते बारीक द्या, बारीक द्या. एवढेच नाही तर तिथे रडायलाही लागते, बघा हं बारीक नसलं तर माझे आई/बाबा/बायको रागावतील. हे सर्व करत असताना आपला दळणाचा डबा/पिशवी, त्या श्वेतकर्बद्विपादास स्पष्ट्पणे दिसले पाहिजेत (नाहीतर तो नंतर विसरू शकतो कुणी बारीक सांगितले वगैरे.) रडगाणे गायल्यावर ९०% माणसे ऐकतात असा माझा अनुभव आहे. रागावलं, आरडाओरडा केला की नाही ऐकत.
अजून खूप इंट्र्कसीज आहेत - समजा नाचणी दळायला टाकायचीय तर टाकणार्‍याचा पहिला प्रश्न पाहिजे, बरोबर काय दिले आहे कारण गिरणीवाले म्हणणार तुमच्याच गव्हावर टाकणार हां. नुसती नाचणी कोण टाकेल? बायदवे हे सर्व दळणाबाबात डंक प्रकार काय आपल्याला जास्त झेपत नाही.
दळण आणण्यातही बरेच बारकावे आहेत - डबा असेल तर तो सायकल, मोटारसायकल, मोपेड, हॅचबॅक, सेडानमधे कसा ठेवावा. उदाहरणार्थ डब्याला सीटबेल्ट लावायला लागतो पण पिशवीला नाही. सायकलवरून जाताना डब्याला परत पिशवी लागते, तीपण लांब बंदांची. मोटारसायकलवर असताना बंद लांब पाहिजेत पण खूप लांब नकोत, खांद्यात अडकतील असे पाहिजेत.
असं काय काय नाटक असतंय. माझ्या डोक्यात तो ॲल्युमिनिअमचा डबा असला बसलाय की, कुठेही डेटाबेसचे ते दंडगोल चिन्ह पाहिले की मला दळणाचा डबाच आठवतो.
*

तर परवा मी नित्यनेमाप्रमाणे दळण टाकलं, रात्रौ साडेआठला आणायला गेलो आणि अनपेक्षितरित्या एका गंभीर प्रसंगास सामोरे जावे लागले. आमची गिरणीवाली, एक डॅंबिस आजी आहे आणि माझ्या अंदाजाने ती या भागातील नामचीन गुंडाची नामचीन नेतीणबाई आहे. कारण सगळे आजूबाजूचे टगे तिच्याशी नीट बोलतात किंवा चौकात एखादी भांडाभांडी चालू असेल तर ती लगेच मिटवते, सगळ्या पार्ट्या ऐकतातपण तिचं. अचानक जागतिकीकरण दत्त म्हणून उभे राहिल्याने गिरणीतल्या भागाचे अचानक अल्ट्रानागरीकरण झाले आहे. त्या चौकात बीएमडब्ल्यू आणि सायकलवाल्यांचीपण भांडणे होतात. अतिशयोक्ती नाही. पण अशीही नॉव्हेल भांडणे त्या बाईला सहजगत्या सोडवताना मी पाहिले आहे. दळणाचं बघायला तिने एक बिहारी ठेवला आहे आणि ही आपली बाहेर तंबाखूच्या चंचीतून सुट्टे पैसे काढून लोकांना देत असते कायम. कधी सुट्टे नाहीत असे म्हणत नाही ही सुस्त्री. हा बिहारी मराठी बोलतो पण त्याचा मूड नसेल किंवा त्याला संकटाची चाहूल लागली तर तो हिंदीत बोलू लागतो. (भांडण करावे लागले तर कॉन्टेक्स्ट मातृभाषेत आधीच सेट असलेले बरे, असा विचार असेल)
मी नेहमीप्रमाणे वरच्या फळीवर बघितले तर तिथे आमची पिशवी नव्हती, शेजारीच  दोन पिशव्या होत्या बर्‍यापैकी सारख्या दिसणार्‍या.  
त्याला म्हणालो - सकाळी गहू टाकलेले ५ किलो. पिशवी नाहीये.
धोका ओळखून तो म्हणाला - "होगाना उधरीही, देखो आगेपिछे"
नाहीये हो.
कितने बजे डाला था?
११:३० वाजता
कैसी पिशवी थी?
लव्हेंडर आणि पांढर्‍या कलरची, बच्चनचं चित्र होतं त्याच्यावर.
अच्छा दावत राईसवाला थैली होता है वैसा क्या.
हां असेल बहुतेक, पण आमची ही काका लोकवन बरोबर मिळालेली पिशवी होती.
मी काही चिडलो नव्हतो पण मला आपले दळण स्टेटस - "आलोच दोन मिनीटात घेवून" चे "इट्स कॉंप्लिकेटेड" होणार आहे हे समजून चुकले होते. सारख्या दिसणर्‍या पिशवीवाल्यांपैकी कोणा एकाने आमची पिशवी नेली हे पीठाएवढे स्वच्छ होते.
आणि हा मनुष्य उगाच आपले काहीही विचारत होता. तेवढ्यात मालकीणबाईंनी लक्ष घातले.  आजी भयंकर ॲक्शन ओरिएंटेड आहेत, त्या म्हणाल्या -  त्या दोनपैकी एक पिशवी न्या ना. काय नावं आहेत त्यांच्यावर मी पाहिले तर - माळी आणि देशपांडे. 
"पण चुकीच्या माणसाची नेली तर, परत नवीन येणारे ओरडतील ना", आजींनी लक्ष घातल्याने गिरणीवाला समजूतीने बोलू लागला होता. माझ्याही मनात हाच प्रश्न होता. मला वाटत होते की काहीतरे मिस मार्पल, पॉयरॉ किंवा शेरलॉक प्रमाणे डोके चालवून, आमची पिशवी कोणी नेली असेल याचा शोध लावावा. त्यासाठी मी सगळ्या फॅक्ट गोळा करू लागलो. आजींना विचारलं - यातलं कोणी ओळखीचं नाही का? माळी, देशपांडे?
त्या वैतागल्याच - तुम्ही इतके दिवस येताय, तुमचं आडनावपण माहित नाही मला. सगळ्यांची नावं आणि चेहरे कसे लक्षात राहतील?
रस्त्यापलीकडचे एक डॉक्टर आले आणि त्यांनी झाला प्रकार समजून घेतला, ते म्हणाले - माळीसाहेबांची बायको इथेच दळण टाकते, थांबा म्हणत त्यांनी माळींच्या घरी फोन लावला.
वहिनी, डॉक्टर बोलतोय, आज दळण नेलं होतं का?
..
बघता का जरा, तुमच्याच नावाची पिशवी नेली आहे का?
..
अहो, एकदाच बघा ना प्लीज, जरा गडबड झाली आहे, तुमच्या नावाची पिशवी आहे का ते बघा.
..

असे दोनचार मिनीटं संभाषण झाल्यावर ते म्हणाले. हो त्यांच्याकडे गेली आहे तुमची पिशवी. त्यांचा मुलगा आजारी आहे तेव्हा त्या आत्ता काही येवू शकत नाहीत पण उद्या सकाळी गिरणीत आणून देते म्हणाल्या. तुम्हाला अगदीच घाई असली तर त्यांची पिशवी घेवून जा, आणि पीठ वापरलं तरी चालेल म्हणाल्या. त्या तुमचं नाही वापरणार, असही निरोप सांगितला आहे.
मी म्हणालो - त्यांना विचारता का प्लीज, मी त्यांच्याकडे पिशवी बदलून द्यायला तर चालेल का? आमचं पीठ संपलय, आणि घरचे शंभर टक्के दुसर्‍या कुणाचं वापरणार नाहीत. शंभर प्रश्न असतील त्यांचे.
डॉक्टरसाहेब सिरियसली खूप सेन्सिटीव्ह होते, त्यांनी माळीवहिनींना कन्व्हिन्स केलं. मला म्हणाले - त्यांना सांगितलं आहे, त्या सोसायटीत खाली येतील पिशवी बदलायला. केशवकुंज माहितेये ना, तिथे सी मधे राहतात त्या.

मी केशवकुंजला गेलो - तर तिथला वॉचमन जगातला सगळ्यात इनकंपिटंट वॉचमन होता, त्याला आपली जबाबदारीच माहित नव्हती. त्याला म्हणालो सीमधे जायचे आहे, तर तो म्हणाला - इथे ए,बी, सी नाही तीन नंबरच्या बिल्डींगमधे जायचे असले तर उजवीकडून दुसरी. 
फायनली माळीबाईंशी भेट झाली खाली, त्यांनी शंभरदा माफी मागितली माझी, मुलाला बरं नसल्याने  त्यांचं चित्त थार्‍यावर नव्हतं त्यामुळे पटकन नाव न बघताच पिशवी घेवून गेल्या.

वेगळी लगेच कळावी म्हणून लव्हेंडर पिशवी घेतली तर तीपण बदलली गेली, आता कस्टममेड स्पायडरमॅनचं चित्र असलेली नेतो हल्ली मी.
सगळ्या नादात दळणाचे पैसे दिलेच नाहीत, आणि मीपण काही विशेष अगदी आठवून पुढच्यावेळी पैसे परत देण्याएवढा प्रामाणिक नाहीये. मागितले तर देईन अजून.

यात लिहीण्यासारखं काही नाहिये खरतर. काय लिहीलं ते परत वाचवतही नाहिये.
**

I look at all the comics' super-villains - Thanos, Steppenwolf, Ego, Hela and I'm like - give me a break, have you met "Stewie Griffin"?
***

Friday, June 30, 2017

न‌वीन‌ न‌वीन‌

अॅम्नेशिआ (विस्मृतीविकार‌ म्ह‌णतात ब‌हुतेक‌) झालेल्या माण‌साला आज‌पासून विस‌रुग्ण‌ म्ह‌णावे. (याआधी योज‌लेला प्र‌तिश‌ब्द‌ र‌द्द‌ क‌र‌ण्यात‌ यावा).
म‌ला कधी क‌धी वाट‌ते की, साव‌र‌क‌रांन‌ंत‌र‌ मीच.


Wednesday, June 21, 2017

दुपार‌च्या बोर मिटींग‌म‌ध‌ले बोर‌ पोस्ट

गृहशोभिकासारखे एखादे व्यवसायशोभक किंवा व्यवसायशोभेश असे मासिक असते तर मी त्यात खालील सदर चालवले असते.

भूभूचा सल्ला - आपले रेटींग हाय्येस्ट ठेवून काम मात्र कमी करण्यासाठी काही टिप्स. (बर्‍याच अनप्रोफेशनल आहेत)

१. ईमेल - 
१.१ आपल्या साहेबांपासून वरच्या चेनमधील प्रत्येकाच्या अतिफालतू मेलला सुद्धा तात्काळ उत्तर द्यावे. लगेच उत्तर तयार नसले तरी, हं, बघतो मी काय करता येईल ते, मार्ग काढू आपण काहीतरी असे उत्तर द्यावे. पुढचं पुढं. 
१.२ आपल्या पिअर लेव्हलच्या लोकांच्या मेलला एक रिमांयडर आल्याशिवाय उत्तर देवूच नये - अगदीच रिमांयडर आले तर उत्तर लिहिताना, शंभरदा सॉरी म्हणावे आणि मग उत्तर द्यावे, इतके आर्जव आणि करुण भाव पाहीजे की रिमांयडर पाठवणार्‍याला अपराधी वाटावे.
१.३ आपल्या खालच्या लोकांच्या मेलला आयुष्यात कधी उत्तर देवू नये. (अपवाद सुट्टी मंजूर करणे, आणि अगदीच ज्याच्याशिवाय एखाद्याचे पूर्ण काम अडेल असे मेल )
१.२ आणि १.३ चा फायदा असा की, त्यातल्या निम्म्या मेलचे रिमांयडर येत नाही. लगेच उत्तर आले नाही म्हणजे लोकांना वाटते याला माहित नसेल, हा बिझी असेल. कधीकधी लोक मेल पाठवयची घाई करतात, मेल पाठवल्यावर त्यांचे त्यांना उत्तर मिळाले असते. कधी त्यांनी पण आपलं एक चेकबॉक्स टीक केल्यासारखं आपल्याला मेल टाकला असतो. थोडक्यात अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर पहिला फोन कधीच घ्यायचा नाही तसे. खरंच गरज असेल तर करती दुसरा फोन.
खूप काम कमी होते. आणि एक म्हणजे कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला कितीही उद्धट प्रश्न विचारले तरी ईमेलमधे अतिशांत रहावे. ही एक गोष्ट मला आयुष्यात जबरदस्त जमली आहे. उपहास वगैरे वापरू नये, खटासी महाखट तर सोडाच. समोरच्याने शिव्या घातल्यातर, मी समजू शकतो असे का म्हणतो आहेस तू, आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय/केला, महाप्रचंड क्षमा करा. परत तेच - समोरचा शांत होतो आणि वरिष्ठ काय समजूतदारपणा दाखवला म्हणून कौतुक करतात. 

२. चॅट/मॉक/आयएम/मेसेजिंग - तुम्ही काय म्हणता ते, मूळ चॅटींग
ईमेलसारखेच आहे याचे पण. साहेबलोकांच्या हायला लगेच हाय. बाकी लोकांच्या बाबतीत एक महत्त्वाचे म्हणजे, त्यांना चॅटवर उत्तर द्यायचे पण जमाना झाल्यावर, आणि जमले तर बरेचदा ते अवे झाल्यावर. पन्नास टक्के वेळेला त्यांचा काय रिस्पॉन्स येत नाही परत. शिवाय बरेचदा आता जरा मिटिंगला जायचे आहे, व्हाय डोन्ट यू सेंड मी अ मेल अबाउट धिस असे म्हणावे आणि मग ईमेलवाला पाथ घ्या.

३. मिटींग्ज
मगाससारखेच. 
३.१ वरिष्ठांची प्रत्येक मिटींग ॲक्सेप्ट करा. रात्रीबेरात्रीपण करा गरज पडल्यास. दुसर्‍यादिवशी उशीरा जावा वाटल्यास.
३.२ आपल्या पिअरच्या आणि खालच्यांची प्रत्येक मिटींग एकतर डिक्लाईन किंवा टेन्टेटीव स्वीकारा. ॲक्सेप्ट नाहीच, काहीही होवो. जायचे तर जावा, पण एन्व्हाईट टेन्टेटीवच स्वीकारा.
हे थोडेसे जॉर्ज कॅस्टॅन्झाटाईप आहे, पण भारी ईफेक्ट येतो याने. एकतर पिअर आणि खालील जनतेकडून अगदी गरज असेल तरच मिटींग इन्व्हाईट येते, आणि वरिष्ठ प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी बोलवायला लागतात. याला कोणी हांजी हांजी करणे असेही म्हणू शकते पण असे केल्याने ॲक्च्युअलमधे फिजीकली हांजी हांजी न करता हांजी हांजी ईफेक्टचा लाभ मिळतो.


४. नेहमीचे काम, कोड डिलीव्हरी, टेस्टींग, एस्टीमेटस वगैरे
कोडींग, एस्टीमेट्स यात काहीही तडजोड करू नका. एस्टीमेट् कमी करायचे नाही म्हणजे नाहीच, काय वाट्टेल ते होवो. १ व २ मुळे आपली इमेज खूपच रिजनेबल माणूस आहे अशी झाली असते त्यामुळे शक्यतो काही अडचण येत नाही. पण एखादा अगदीच अडला व म्हणला हे एस्टीमेट्स खूप जास्त आहेत तर हात वर करावेत, माझ्याकडून पाहिजे तर हे असे, रिस्क घेणारी लोकं तशीही नोकरीत कमी असतात उगाच एखाद्याच्या एस्टीमेस्ट्सच्यापेक्षा कमीत काम पूर्ण करायचे आव्हान शक्यतो कोणी स्वीकारायचे नाही. अगदीच कोणी माईकालाल निघाला असा तर त्याला बिन्धास्त करू द्यावे, पूर्ण सहकार्यही करावे. वेळेच्या आधी गोष्टी होतच नसतात, अधेमधे काहीतरी शंभर नवीन सिनारिओ लफडी येतात, तेपण नीट करावे. सर्वच्य सर्व कोपर्‍याकोपर्‍यातले सिनारिओ रोज या माईकालालला सांगावे, हेपण हॅंडल कर, तेपण कर, मग मधेच परफॉर्मन्स रन्स कर वगैरे सगळे मेलवर नम्रपणे सुचवावे. व सगळे सुचवताता, अपटू यु हां, मी आपलं सांगितलं असं ॲटीट्यूड असावं. शेवट एकतर आपण दिलेल्या एस्टीमेट्च्या आसपासच होतं ते काम, माईकालालपण नरमतो तोवर.

५. लष्कराच्या भाकर्‍या
५अ. हे महामहत्वाचे. बर्‍याचदा अशी संधी चालून येते की, तुम्हाला एखाद्या कामाची पूर्ण जबाबदारी नसते पण केवळ सल्ला मागितला जातो. अश्या सुसंधी सोडू नका. शंभर उपाय सुचवा. एखादातरी चालतोच. फुकटचं कौतुक, शिवाय तुम्ही काही कोणांच क्रेडिट घेत नाही आहात, त्यांनीच तुम्हाला सल्ला मागितला होता.

५ब. (श्रीयुत स‌र्किट यांच्या सौज‌न्याने)
आपल्या मालकाला कुणी काय ॲक्शन आयटम देतयं का यांवर चौफेर डोळा ठेवावा. त्याने मदत न मागताही व्हाॅलंटीयर करावं. गडी उपकार विसरणार नाही. त्यातून जर त्या कामाची डेडलाईन ऊद्यावर असेल तर डबल ईफेक्ट येतो. हे करताना आपली स्वत:ची कामं बोंबलली किंवा हाताखालचे करवदले तरी बिंदास चालू रहावं.

असलं सगळं दहा-पंधरा वर्ष नोकरी झाल्यावर अंगवळणी पडतं. मनातल्या मनात असे अल्गोरिदम बनतात, बारक्या मुलांची मनं अशी नसतात. 

Thursday, May 18, 2017

महाराज विशालग्रीवांच्या समस्येचे निराकरण

दिवसभर पेंटिंग सुरू होते, टिव्ही नाही, ऑफिस नाही, एंटरनेट नाही, सगळं सामान कुलुपात बंद, एक लॅपटॉप आणि एक मी, करायचे काय?
*****

महाराज विशालग्रीवांच्या समस्येचे निराकरण.

"एप्रिल, तू निरागस नाहीस व पूर्णधूर्तही नाहीस. थोडीशी चतुर आणिक बरीचशी प्रेमळ आहेस, सिंहासनाशी निष्ठावान आणि अनुरक्त तर नक्कीच आहेस. आमच्या प्रजाजनांसारखी. आमच्याच नव्हे तर तुमच्या आणि या चक्रतलावरील सर्व साम्राज्यांतील बहुसंख्य प्रजा असते तशी. प्रजेची कारणे निराळी असतील पण त्यांनाही तुझ्यासारखे निष्ठावान असणे आधी महत्वाचे वाटते, कारणे त्यानुसुरून नंतर शोधतात. 
महत्वाचे म्हणजे तू राजकन्या असूनही तुझी प्रवृत्ती अशी आहे. हाच तुझ्या आणि माझ्यातील मुख्य भेद आहे, तुझा प्रस्ताव, विनवणी मला मान्य होणे कदापि शक्य नाही. कोणे एके काळी मी चुकून वा मुद्दामून तुला काही सहाय्यता केली होती तिच्या भाराखाली तू स्वत:ला गुंतवले आहेस आणि त्यात आता अडकून पडली आहेस. तू ज्या संकटातून मला वाचवू पाहतेस ते माझ्यासाठी संकट नसून सुवर्णसंधी आहे.
असो. तुझ्याच भल्यासाठी सांगते, एप्रिले, बल्कराष्ट्राची भावी नववधू, भावी सम्राज्ञी आहेस तू. शक्य होईल तेवढ्या लवकर तुझी वृत्ति बदल, विद्याभ्यास संपला आहे, आता कूटप्रश्नाचे उत्तर चुकले तर ते प्राणांवरचे संकट असेल."
एप्रिलने ग्रीवनारची राजकन्या धनुर्भूवीकडे एक कटाक्ष टाकला. तिच्या नजरेतील करुण आणि क्रोधयुक्त संमिश्र भाव बघून धनुर्भूवी, हसत म्हणाली - चल, आता जायच्याक्षणापर्यंत आपले वाद नकोत. पुढच्या बहराला नक्की परत ये, दूताकरवी निरोप पोहोचेलच तुला.
*

"महाराज विशालग्रीव यांचे आगमन होत आहे". रक्षकाचे बोलणे संपताच बभ्रुबाहू तडक उभा राहिला, तशाच ढम्म बसलेल्या प्रखरमित्राला त्याने जोरात टप्पल मारली आणि म्हणाला - "बधिर आहेस का? आणि जरा नीट उभा रहा". प्रखरमित्र अनिच्छेनेच उभा राहून पुटपुटला, "महाराज आता मुख्यद्वारापाशी असणार, ते येथे पोहोचेस्तोवर अजून बराच अवधी आहे, तोपर्यंत तू उभा राहू शकतोस, तू सैनिक आहेस, मला का उगाच त्रास?". बभ्रुबाहूने हसून प्रखरमित्राचे खांदे मागून दाबले. 
प्रखरमित्र म्हणाला, "बभ्रू, भविष्यात अशी काही सुविधा करता येईल की, आपण एखादे उपकरण कायम जवळ बाळगायचे. ते आपण दिवसभर कितीवेळ उभे राहिलो, किती चाललो, किती धावलो त्याची नोंद करेल, तुम्हा सैनिकांना तर खूपच उपयुक्त ठरेल ते." 
बभ्रुबाहू कक्षाच्या प्रवेशद्वाराकडे बघत म्हणाला, "किती झोपलो याची नोंदसुद्धा ठेवावी त्या उपकरणाने, तुमच्यासारख्या लिपीकवर्गासाठी चांगलेच उपयुक्त...महाराज येत आहेत, कृपया माझ्यावर उपकार करुन, महाराजांशी बोलताना मधेच असंबद्ध कल्पना काढू नकोस, विषयाला धरुनच बोल, कृपया..."
रक्षकाने द्वार बंद केल्यावर महाराजांनी नजरेनेच दोघांना बसायची खूण केली. बभ्रूबाहूने उभे राहून महाराजांना पुनश्च अभिवादन केले आणि म्हणाला, "महाराज, हे ग्रीवनारच्या मुख्यकोषागारातील अभिलेखापाल व मुख्यविश्लेषक, प्रखरमित्र. प्रखरमित्र हे सारकुलीन आहेत. हे माझे बालमित्र आहेत, वेळोवेळी त्यांनी मला विविध समस्यांचे निराकरण करण्यास सहाय्य केले आहे. अधिकृतरित्या जरी ते लेखापाल असले तरी, सर्वच क्षेत्रात ते पारंगत आहेत. आपण सांगितलेले कार्य चोख पार पडतील."
महाराजांनी प्रखरमित्राकडे नजर टाकली तेव्हा प्रखरमित्राने उभे राहून त्यांना अभिवादन केले. 
महाराज म्हणाले, "प्रखरमित्र. खरेतर याकामी सेनापती शारबाहूंची मदत घेता आली असती पण, बरेचदा सेनापतींपेक्षा त्यांच्या सुपुत्रांकडून विशिष्ट प्रकारची कार्य जास्त सुलभरित्या पार पडतात. बभ्रूने तुम्हाला आणले आहे म्हणजे निष्ठेचा आणि विश्वासाचा प्रश्नच येत नाही...". महाराजांचे बोलणे सुरू असतानाच प्रखरमित्र अचानक वळला आणि किंचितसा असा झुकला की, महाराजांना त्याच्या मानेची बाजू स्पष्ट दिसेल. महाराजांनी त्याच्याकडे नीट पाहून घेतले - ग्रीवनारच्यामानाने बुटका, शिडशिडीत बांध्याच्या तरुण. त्याच्या बारीक पिचपिच्या डोळ्यांनी महाराजांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे पातळ ओठ हळूच हलल्यासारखे वाटले.
बभ्रूबाहू रागाने काही बोलणार तेवढ्यात महाराज म्हणाले - "वा, प्रखरमित्र नाव अगदी सयुक्तिक आहे, बसा. प्रत्येक सोमवारी आम्ही सुरभिवनात वनभोजनासाठी जातो. तुम्हाला माहित नसल्यास, सुरभिवन म्हणजे ग्रीवनार राज्याची वायव्यसीमा, मणिनारला जिथे मिळते तेथील वन. राजप्रासादातून वनात पोचायला अर्धा प्रहर लागतो. प्रत्येक सोमवारी सूर्योदयाच्या थोडे आधीच आम्ही, महाराणी तनुग्रीवा, सेनापती शारबाहू, देवी तनुबाहू, आमचे अंगरक्षक दल, अश्वपाल तुरंगरंग, आपले मुख्यबल्लवाचार्य, असे सर्व जण सुरभिवनात जातो. साधारण वीस माणसे, तीन रथ, लागतील तेवढे अश्व असा लवाजमा असतो. आणि हो, विद्याभ्यास संपवून ग्रीवनारमधे परत आल्यापासून राजकन्या धनुग्रीवाही आमच्यासह येतात. आम्ही तिथे पोचलो की, महाराणी, त्यांच्या दासी व सर्व सैनिक मिळून मंडप उभारणी करतात. तोपर्यंत आम्ही व शारबाहू जवळच भोजनाच्या व्यवस्थेसाठी मृगयेला जातो. राजकन्या मात्र वनात पोहोचल्यावर लगेच नेहमीच अश्वारुढ होवून त्यांच्या सखीसमवेत रपेट मारुन येतात." महाराजांनी मधेच क्षणभर उसंत घेतली, बभ्रूबाहूने आश्वस्त मान डोलावली तेव्हा परत बोलू लागले - "बरेचदा, म्हणजे नेहमीच त्या सीमेजवळच्या शिवालयात दर्शन घेवून येतात, दर्शनच नाही त तिथे साधारण तासभर ध्यानही करतात. प्रखर तुम्हाला-तुला वेगळे सांगायची गरज नाही तरीपण, हे संभाषण या कक्षापुरतेच. महाराणी, शारबाहू, आणि आता आपण दोघे यांशिवाय कुणालाही हे माहित नाही. महाराणींना अर्थातच हे मान्य नाही, अशा आचरणाने समस्त ग्रीवनारदेशातील स्त्रिया पुन्हा धर्मरत होतील अशी त्यांची आशंका आहे पण राजकन्या ग्रीवकुलाचे नावही लावत नाहीत त्यापुढे हे बंड काहीच नाही. असो. आपण भरकटलो". प्रखर अचानकच जोरात म्हणाला - "वावा, जे भरकटते तेच खरे संभाषण."  
"मूळ प्रश्नाकडे परत वळू", महाराज त्रासिक स्वरात पुढे सांगू लागले - "मृगयेनंतर आम्ही व शारबाहू, बल्ल्वाचार्यांच्या मदतीने मृगांचे विविध पदार्थ बनवितो आणि सर्वजण मिळून खातो. बरेचदा सोमरस ही सोबत असतो, परंतु अगदी कमी. त्यानंतर जलक्रीडा, कधी रासक्रिडा किंवा मंडपात विश्रांती घेतो. बरेचदा सोमवारी मणिनारचे महाराज पंगमणि व त्यांचे राजपुत्र पिंगमणीशी व राजकन्या मणीपुष्या हे शिवालयात येतात, ते आल्याची वार्ता असेल तर आम्ही व शारबाहू शिवालयानजीक त्यांची अनौपचारिक भेट घेवून येतो आणि तद्नंतर आम्ही सर्वजण राजप्रासादाकडे परत यायला निघतो. आता तुम्हाला येथे बोलावले कारण - मागील सोमवारी, सुरभिवनातून परत आल्यापासून आम्ही अस्वस्थ आहोत. आम्हाला सारखे मनातून असे वाटते आहे की, काहितरी बरोबर नाहीये, काहीतरी चुकते आहे. खरेतर काय वाटते आहे तेही सांगता येत नाही. आम्हाला काय म्हणायचे आहे ते कदाचित आम्ही नीट सांगू शकत नाहीये. पण आज शुक्रवार आला तरी मनातून ही भावना जात नाही आहे. राजाचे असे वागणे सर्वांना हास्यास्पद वाटेल, अर्थातच बभ्रूला नाही वाटणार याची खात्री आहे आम्हाला." मधेच बभ्रू म्हणाला - "महाराज, प्रखरने याआधीही माझ्यासाठी अशा समस्या सोडवल्या आहेत. ज्यांत प्रश्न काय आहे हेच उत्तर शोधण्याआधी शोधावे लागते अशा समस्यांचे निराकरण करण्यात तो वाकबगार आहे." महाराज परत बोलू लागले - "तर प्रखर, ही आहे आमची समस्या. त्यादिवशी आम्हास नक्की असे का वाटले हे तुम्हास शोधायचे आहे. प्रात:समयी मी याविषयी बभ्रूशी सविस्तर चर्चा केली आहे, त्या दिवसाविषयीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे आहे. एव्हाना तुम्हाला कळालेच असेल, ही बाब आपल्या तिघांनाच माहिती आहे, तशीच रहावी. आमच्या समस्येचे निराकरण करावयाचा तुम्ही जो काही प्रयत्न कराल तो करताना समस्या मात्र कुणाला कळता कामा नये, महाराणींनासुद्धा. आम्ही मंगळवारीच शारबाहूंना आदेश देवून सुरभिवनाच्या परिसरात सैनिकांची संख्या थोडी वाढवली आहे, अगदी कोण्याच्या लक्षात न येण्याजोगी. ". प्रखरमित्राने महाराजांकडे हसत एकवार नजर टाकली - थोडासा स्थूल पण कमवलेला देह, मुकुट नसलेले केशविरहीत मस्तक, तलवाराकृती मिशा, मोठे गोल डोळे, गरुडासारखे नाक, भक्कम मान व शरीराच्या मानाने दीर्घ हात." प्रखरमित्र उभे राहून म्हणाला, "महाराज माझ्याच्याने शक्य होईल ते सर्व मी करीनच...". महाराज कक्षातून निघाले, जाताना परत वळून म्हणाले - "आणि हो, अर्थव्ययाची चिंता नको, मला समाधानकारक स्पष्टीकरण मिळाल्यास तुझी अर्थार्जनाची चिंता तर कायमची नष्ट होईल." प्रखरच्या चेहर्‍यावर एवढे मोठे हसू त्यांनी भेटल्यापासून प्रथमच पाहीले आणि ते त्वरेने निघूने गेले.

"शक्य तेवढ्या लवकर आपल्याला महाराजांना या विवंचनेतून सोडवले पाहिजे", राजप्रासादातून बाहेर पडताना बभ्रूबाहूने चिंताक्रांत मुद्रेने प्रखरमित्राला सांगितले. प्रखरमित्र म्हणाला, "बंधू, सध्या या राजप्रासादी भाषेतून बाहेर पडलो हे बरे झाले, हाहाहा". बभ्रूबाहूने हसल्यासारखे केले. गंभीर मुद्रा करत प्रखरमित्र म्हणाला - "बभ्रू, तुला काय सुचित करायचे आहे ते मला कळते आहे, पण तुला पूर्वानुभव आहेच, मध्यप्रहरानंतर मला पुरेशी निद्रा मिळाली नाही तर आजचा पूर्णच दिवस वाय जाईल. तू तुझे दैनंदिन कामकाज संपवून संध्याकाळी माझ्या घरीच ये, मी कोषागारात जातो, माझे आटपेलच तासाभरात". बभ्रूबाहूने घोड्याला टाच मारली आणि धुरळा उडवत निघून गेला.
*

"बभ्रू, आपण खूपवेळ बोलणार आहोत तेव्हा, बाहेरच ओंडक्यावर पडून बोलू." बभ्रूबाहूने एकवार दारापाशी जावून आपल्या घोड्याला गोंजारले, त्याच्याशी काहीतरे पुटपुटून तो प्रखरच्या समोर बसला. त्याची ती रुबाबदार आणि उंच आकृती आणि समोर बुटकासा प्रखर बघून हे दोघे परममित्र आहेत याच्यावर कुणाचा विश्वास बसला नसता. "सर्वप्रथम, तुला झोप आली, किंवा कंटाळा आला तर तसे स्पष्ट सांग, प्रखर. तू यांत्रिकपणे हूं हूं म्हणतोस आणि मीही गोष्टी सांगायच्या नादात असतो मला कळत नाही तू पेंगत आहेस ते." प्रखरने मान डोलावली. बभ्रूबाहू एकाग्रचित्ताने काही सांगू लागला की त्याच्या कपाळावरील मधली शीर तट्ट फुगायची, ते दृष्य प्रखरमित्राला फारच आवडे. "महाराजांनी ढोबळ कार्यक्रम सांगितलाच आहे, प्रात:समयी जेव्हा आमचे बोलणे झाले तेव्हा मी खूप तपशीलवार चौकशी केली की मागील सोमवारी नक्की काय कार्यक्रम झाला. आणि तो नेहमीप्रमाणेच होता का काही वेगळा. सोमवारी कार्यक्रमात काहीच बदल नव्हता, त्यांनी सोमवारी जलक्रीडा केली, त्यांच्याबरोबर कोणीही नवीन व्यक्ती नव्हती, भोजनात कुठलाही वेगळा पदार्थ नव्हता, जाण्यायेण्याची वेळही साधारण नेहमीप्रमाणेच होती."
प्रखरमित्राने दोन्ही पंजे हवेत पुढे करुन थांब सांगितले आणि म्हणाला - "असे नको, तेच तेच बोलले तर कुठल्याही विषयाचा कंटाळा येतो, अपवाद धन आणि स्त्री...कधीकधी पुरुषही. तर आपण असे करू, मी प्रश्न विचारतो तू उत्तरे दे, मग माझे प्रश्न संपले आणि तरी तुझ्याकडे काही माहिती असली तर ती शेवट सांग. 
ठीक - महाराजांना नक्की कधी काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले?" 
"माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न हाच होता. त्यांना नेमका क्षण आठवत नाही पण दिवसभर त्यांना काही वेगळे वाटत नव्हते. परत येताना मात्र त्यांना अशी जाणीव होवू लागली".
प्रखरमित्र - त्यादिवशी भोजनात काही बदल?
बभ्रूबाहू - नाही, नेहमीचेच, मृग, तरस, रानडुक्कर वगैरेंचे मांस, मसाला नेहमीचाच, स्वयंपाक करणारे लोकही नेहमीचेच, बल्लवाचार्य, महाराज, बाबा ईत्यादी. भोजनाची वेळ पण नेहमीसारखीच, जेवणानंतर कोणाला काही त्रासही झाला नाही.
प्रखरमित्र - एखादे नवीन वाहन, नवीन रथ, नवीन अश्व?
बभ्रूबाहू - नाही.
प्रखरमित्र - ठीक मग नेहमीपेक्षा वेगळ्या म्हणता येतील अशा काही बाबी?
बभ्रूबाहू - लक्षात घे, ही माहिती मला महाराजांकडून मिळाली आहे, त्यांच्या दृष्टिने सोमवारी वेगळे काहीच नाही घडले. तेथे असणार्‍या इतर लोकांबरोबर वार्तालाप केल्यास आपणांस अधिक माहिती मिळेल. पण महाराजांच्या आज्ञेत रहायचे असल्याकारणाने आपल्याला लोकांशी याविषयावर बोलता येणार नाही.
प्रखरमित्र - अर्थातच, महाराजांच्या आज्ञेत राहूनच या प्रकरणाचा शोध घ्यायचा आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण लोकांशी सोमवारबद्दल बोलू शकत नाही. सोमवारी सेनापती शारबाहू यांच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ सुरभिवनात हरवली आहे, सेनापतींना ती माळ अतीव प्रिय आहे त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे - सेनापतींना काय सांगायचे ते तू पाहूने घेशीलच.
बभ्रूबाहू - ठीक आहे, उद्या आपण बल्लवाचार्य, महाराजांचे अंगरक्षक दलप्रमुख धैर्यदत्त, राजकन्या धनुची सखी केतकी, मुख्यसारथी शतांगनाथ यांच्याशी बोलू. बाबा आणि आईशी बोलताबोलता मी सोमवारविषयी बोललो आहे, त्यांच्या आणि महाराजांच्या माहितीत काही विशेष फरक नाही. आईशी बोललो आहे त्यामुळे, महाराणींशी बोलण्याची काही आवश्यकता नाही.
प्रखरमित्र - वावा. महत्वाचे म्हणजे...
बभ्रूबाहू - अरे मूर्खा, महाराजांशी बोलतानाही तू तुझे ते चिघळविंथ का खात होतास? मी तुला आधीच सांगितले होते.
प्रखरमित्र - अरे आता विषयांतर कोण करत आहे? महाराजांना कळालेही नाही मी काही खात होतो ते, ग्रीवनारच्या कोणालाच कळणे शक्य नाही चिघळविंथाविषयी.
बभ्रूबाहू - महाराजांना चांगलेच कळाले, त्यांनी मला हा पदार्थ मागितला आहे, जाताना मला दे...असो, तू काय म्हणत होतास?
प्रखरमित्र - आपण उद्या सर्वांशी वार्तालाप करुच पण आधी आपण या समस्येचे थोडे विश्लेषण केले पाहिजे तरच आपल्याला सर्वांना योग्य प्रश्न विचारता येतील. काहीतरी चुकल्यासारखे वाटणे म्हणजे नक्की काय? तुला असे कधी होते का? होते तेव्हा नक्की काय वाटते.
बभ्रूबाहू - मी उत्तर देणे अपेक्षित आहे का तुझ्या दीर्घ भाषणाचा भाग आहे हा?
प्रखरमित्र - आपली पंचेंद्रीये आपल्याला सभोवतालचे भान देतात. जेव्हा आपल्याला जाणवते आहे ते नेहमीपेक्षा वेगळे असते तेव्हा आपला मेंदू नेहमीपेक्षा वेगळी कृती करायचा भाग पाडतो. बरेचदा आपले ईंद्रिय योग्य माहिती पुरवते पण मेंदू तिचा योग्य वापर करु शकत नाही कारण ती माहिती नेहमीपेक्षा वेगळी असली तरी खूप जास्त वेगळी नसत त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष होते. कळाले? वावा. उदाहरणार्थ, तू रोज संचलन व युद्ध सराव घेतोस, तुझ्या तुकडीमधे सैनिकाऐवजी अचानक एखादा सिंह उभा असलेला दिसला तर तुझ्या लगेच लक्षात येवून तू योग्य ती कृती करशील. म्हणजे पळून जाशील. अरे रागावू नकोस. बर दुसरे उदाहरणा घेवू, समजा तुझ्या तुकडीमधे अचानक केतकी आली तर लगेच तुझ्या ते लक्षात येवून तू योग्य ती कृती करशील. का अयोग्य रे?
बभ्रूबाहू उठू लागला. 
प्रखरमित्र - नाही नाही, आता पुन्हा नाही, मुद्दा ऐक. समजा संचलनावेळी तुझ्या तुकडीतील सैनिकांनी उभे राहताना एकमेकांपासून नेहमीपेक्षा दोन वीत जास्त अंतर ठेवले तर तर तुझे डोळे ते टिपतील पण कदाचित मेंदू ही माहिती तात्काळ वेगळी आहे असे वर्गीकरण करणार नाही. तू पुरेसा हुशार असशील तर नंतर मात्र तुला रोजच्यापेक्षा काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटेल. कदाचित तुला असे का झाले याचे कारण नंतर उमगेलही. पण तोपर्यंत अस्वस्थ वाटेल. हो का नाही. हाच प्रकार आवाजाच्या, स्पर्शाच्या, वासाच्या आणि चवीच्या बाबतीतही होवू शकतो. उद्या आपल्याला सर्वांशी बोलताना याचे भान ठेवायचे आहे. महाराजांच्या ईंद्रियांना नक्कीच काहीतरी जाणवले आहे पण नक्की काय ते मेंदूने नोंदविले नाही. असे एखादे उपकरण की जे आपल्याला समोर दिसते आहे त्याचे तात्काळ चित्र...
बभ्रूबाहू - तुझे विश्लेषण मान्य आहे. एक लक्षात ठेव, आपल्याला फार काळजीपूर्वक वार्तालाप केला पाहिजे कारणा सध्या राजकीय पटलावरील परिस्थिती नाजूक आहे, आपण कशाचा शोध घेतो आहे असे कुणाला कळाले तर एका प्रहरात महाराज भ्रमिष्ट झाले आहेत अशी अफवा पसरायला वेळ लागणार नाही.
प्रखरमित्र - राजकीय पटलावरील परिस्थिती कायमच नाजूक असते.
बभ्रूबाहू - नाही मित्रा, ग्रीवनार आणि मणिनारमधील पस्तीस वर्षांपूर्वीच्या शांतता कराराचे नूतनीकरण, राजकुमारी धनुचे स्वयंवर, हे येत्या दोन महिन्यातच पार पडणार आहे. शिवाय बल्कराष्ट्राने सर्वांवर नाविकशुल्क लादले आहे त्याविरोधाचे ग्रीवनारने नेतृत्त्व करावे असा महाराजांवर मित्रराष्ट्रांचा दबाव आहे. एकूण राजगादी उलथविण्यासाठी एकदम योग्य वेळ आहे. कदाचित यासर्वांमुळेही महाराज जर जास्त सतर्क आहेत.
प्रखरमित्र - ह्म्म, शक्य आहे. तसेही वर्तमानातल्या सर्व घटना एकमेकांशी निगडीत असतात असा माझा फार पूर्वीपासूनचा सिद्धांत आहे.
दोघांनी उठून हलकेच एकमेकाच्या पाठीवर थाप मारली तेवढ्यात प्रखरमित्र पटकन आत गेला आणि आल्यावत म्हणाला - "हे घे, महाराजांना आवडले तर अजून पाठवेन. उद्या सकाळी भेटू."
बभ्रूबाहू घोड्याला टाच मारणार तेवढ्यात प्रखर ओरडला - "बभ्रू, महत्वाचे राहिलेच, मी सुरभिवनात जास्त गेलो नाहीये, दोन महिन्यांपूर्वी गेलो होतो, ग्रीवनार आणि मणिनारमधील लेखापालांचे संयुक्त संमेलन होते तेव्हा. तेव्हाच्या आठवणीनुसार तर तिथे मायेचा प्रभाव असलेले कुठलेही क्षेत्र नाहीये, पण तुझे काय मत"
बभ्रूबाहू म्हणाला - "ग्रीवनारमधे मायेला स्थान नाही. उद्या बोलू" आणि भरधाव निघून गेला.
*

"कल्लोळ, केवळ क.ल्लो.ळ. दिवसभर आपल्याला कायकाय माहिती मिळाली आहे ती मी मांडतो, मग एकत्र विश्लेषण करु", प्रखरमित्राने जाहीर केले, आणि तडक आत गेला. येताना त्याने दोन द्रोणभरुन चुरमुरे, कांदा आणि मसाला आणला. बभ्रूबाहू जोरात हसून म्हणाला, "अरे ही वेळ सोमपानाची आहे पण तुला कोण सांगणार, बालका". त्याच्याकडे दुर्लक्ष करुन कांदा चिरता चिरता प्रखरमित्र बोलू लागला - 
एक. आपल्याकडे प्रचंड माहिती आहे
दोन. ती सुसूत्र मांडली पाहिजे, आणि माझ्यावर पूर्वी हसला असलास तरी हे विशालभूर्जपत्र आता या मांडणीसाठी उपयोगी पडणार आहे, त्याला आपण असे उभे करू.
"तीन. अंगरक्षक दलप्रमुख धैर्यदत्त माळ शोधायला उद्या सुरभिवनात स्वत:चे एक दल पाठवू म्हणतात, त्यांना तू अर्थातच थांबविले असशील. त्यानांही रुद्राक्षाची माळ कुठे पडली ते ठावूक नाही त्यांच्या वावरातला परिसर जरा जास्त आहे - मंडप, जलाशय, वालय, शिवालयाचा रस्ता, हरणे आणि रानडुक्कर मारले तो भाग. त्यांना सोमवारी एक बदल जाणवला होता, परत येताना त्यांच्याबरोबरचे श्वान नेहमीपेक्षा जास्त उत्साही वा आनंदी वाटत होते. हे महत्वाचे आहे. सध्या. शेवट ते म्हणाले कदाचित भ्रमही 

असेल, बाकी सैनिकांना तसे जाणवले नाही. हे महत्वाचे नाही.
चार. बल्लवाचार्यांना काही रुद्राक्षाची माळ कुठे पडली ते ठावूक नाही अर्थातच, त्यांच्या वावरातला परिसर म्हणजे - मंडप आणि समोरचे जलाशय. आपल्या प्रश्नातील सोमवार आणि त्याच्याआधीचा सोमवार यातील वाणसामानात एक महत्वाचा फरक म्हणजे या सोमवारचा मांसाला लावला जाणारा मसाला बल्कराष्ट्रातून आला होता, पूर्वी तो मणिनारमधून असायचा. आणि भावी सेनापती बभ्रूबाहू, चौकशीच्या वेळी बल्लवाचार्यांनी जेव्हा विचारले - याचा हरवलेल्या माळेशी काय संबंध, तेव्हा झटकन उत्तर न देता तुम्ही थोडा कालापव्यय केला तसे परत केलेत तर भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल"
बभ्रूबाहू - "तू प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारलास त्यामुळे बल्लवाचार्यांना असा प्रतिप्रश्न पडला, पुढे"
"पाच. केतकीला वाटेत कुठेच माळ दिसली नाही आणि तिच्या मते आपण वेगळीच काही माहिती काढू इच्छित होतो. तिच्या वावरातला परिसर साधारण धैर्यदत्त यांच्याएवढाच, फक्त वेळ वेगळी, ती शिवालयात राजकन्येबरोबर गेली होती. तिला जाणवलेला बदल म्हणजे शिवालयाजवळ तिला क्षणभर मंदसा फुलांचा वास जाणवला. बहराचे दिवस पूर्ण सरले नाहीत त्यामुळे हे साहजिकच आह. हे महत्वाचे आहे का नाही ते ठरवावे लागेल. आणि एक...भावी सेनापतींचा वेळ महत्वाचा असतो हे समजून घेवून त्यांनी काम झाल्यावर संभाषण संपवायची सवय लावावी."
बभ्रूबाहू हसला.
"सहा - तुरंगरंग यांना ताप आला होता, त्यांनाही माळ कुठे गहाळ झाली असेल काही कल्पना नाही, पण त्यांनाही माळ शोधण्यात रस आहे. बभ्रू, पुनश्च एकवार - धैर्यदत्त आणि तुरंगरंग यांना माळेच्या शोधकार्यापासून परावृत्त करायचे महत्त्वाचे काम तुझ्याकडे आहे. तुरंगरंग महाराजांच्या रथा पुढील रथाचे सारथ्य करत होते. सुरभिवनात त्यांचा वावरही जवळपास महाराजांसारखाच होता, तेव्हा त्यांना काही विशेष निराळे आढळले नाही. पण त्यांनी सांगितलेली महत्वाची गोष्ट म्हणजे सोमवारी परतताना त्यांना त्यांचा रथ दोलायमान वाटत होता, म्हणून त्यांनी प्रवास सुरु करायच्या आधी एकदा नीट पाहून घेतला. नगरीत परत आल्यावर त्यांनी रथशालेत याची कल्पना दिली होती.
सात - मुख्यसारथी शतांगनाथ यांच्याकडून शून्य माहिती मिळाली, ते या महिनाखेरीस कार्यमुक्त होणार आहेत त्यामुळे कदाचित अनुत्साही असावेत. मी त्यांच्याविषयक कागदपत्रे तपासली असता माझ्या ध्यानात आलेली एक बाब म्हणजे, त्यांचे मणिनारच्या व्यापार्‍यांशी खूपच चांगले संबंध आहेत. हेही महत्वाचे आहे.
बभ्रू, बभ्रू..."
बभ्रूबाहूची तंद्री लागली होती, दुसर्‍या हाकेने तो भानावर आला आणि तो जवळपास ओरडलाच - "मला वाटते, महाराजांना हे सर्व विसरण्यास सांगावे, आपण आपला, म्हणजे मुख्यत्वे मी माझा मौल्यवान वेळ वाया घालवत आहे. कदाचित महाराजांना उगाच तसे वाटले असेल थोडेफार थकव्याने." प्रखरमित्राने त्याचे पिचपिचे डोळे अजूनच पिचपिचे केले व त्याच्या गरुडासारख्या नाकात बोट पटकन घालून काढल्यासारखे करून म्हणाला, "तुझे म्हणणे मला मान्य आहे, पण अशीही एक शक्यता आहे की, दिवसभराच्या शीणाने तुझ्य मनात आत्ता हे असे विचार येत आहेत. असो. एकूणात तीन गोष्टी निराळ्या होत्या - बल्कराष्ट्रातील नवीन मसाला, केतकीला जाणवलेला मंद सुवास, परत येताना उत्साही वाटलेले श्वान. एकेक बघू.
एक - बल्कराष्ट्रातील मसाला.
महाराज, महाराणी यांची प्रकृती कशी आहे? काही जाणवेल असा बदल? चार दिवस नक्कीच झाले, आज शनिवार आहे"
प्रखरमित्राच्या या प्रश्नाने बभ्रूबाहूला जणू पुन:उत्साह आला, तो म्हणाला - "महाराज, पिताजी, सर्वांची प्रकृती उत्तम आहे, त्या मसाल्याचा तसा काही अनिष्ट परिणाम झाला नसावा, मी लागलीच बल्लवाचार्यांवर पाळत ठेवायला हेर नेमतो."
"बभ्रू, बभ्रू थांब, लेखापाल असल्याने मी बर्‍याच अशा गोष्टी करु शकतो ज्या बसल्याबसल्या बरीच माहिती देतात, मी भोजनशालेचे गेल्या दोन वर्षातील सर्व क्रयविक्रय नोंदी तपासल्या आहेत आणि मला त्यात काही संशयास्पद आढळले नाही. एकूणच बल्ल्वाचार्य दर दोनेक महिन्यांनी विविध देशातील नवनवीन गोष्टी मागवत असतात आणि महाराजांना नवनवीन पदार्थ खाऊ घालतात. आजपावेतो या चक्रतलावरील सर्व देशातून त्यांनी विविध सामान मागविले आहे, महाराजांची खाण्याची आवड लक्षात घेता त्यांना अजून चिघळविंथ माहित नव्हते हे एक आश्चर्यच. पण बल्लवाचार्य़ आणि नवीन मसाला या गोष्टींचा या प्रकरणाशी संबंध नाही. मी आपले निश्चितीसाठी सर्वांच्या प्रकृतीची विचारणा केली." प्रखरमित्राचे बोलणे ऐकून बभ्रूबाहूचा तात्कालिक उत्साह मावळला.
दोन - मंद सु.."
"केतकीला जाणवलेला मंद सुवास" - प्रखरमित्राचे बोलणे संपायच्याआतच बभ्रूबाहू घाईत म्हणाला. "हो केतकीला जाणवलेला मंद सुवास, मुळात या तरुणीचे नावच केतकी आहे, त्यामुळे तिला जाणवणारा प्रत्येक गंध सुवासच असणार, हाहाहा" - प्रखरमित्र असे बोलून जोरजोरात हसू लागला.
"तुझ्या त्या उपकरणांच्या यादीत असेही उपकरणा शोधायची नोंद कर की, स्वत:च असा एखादा कंकर विनोद करुन हसणार्‍याचे मुख पुढील तासभर बंदच रहावे", बभ्रू चिडून म्हणाला.
"बर, बर, बर...आपण मूळ मुद्द्याकडे वळू...आपल्याला मिळालेली माहिती अजिबातच पुरेशी नाही, शिवालयापाशी महाराज नसताना केतकीला मंद सुवास आला असेल तर त्याचा महाराजांवर काही परिणाम होणे अशक्य आहे. मला तर वाटते आहे की, केतकी केवळे तुझ्याशी संभाषण लांबविण्यासाठी काहीबाही आठवून सांगत होती. पण तरुणी प्रामाणिक वाटली, तूर्तास आपण ही माहिती बाजूला ठेवू." प्रखरमित्राचे बोलणे बभ्रूबाहूला पटत होते, खरेतर त्याला या प्रकरणाचा कंटाळा आला होता, एकतर सर्वांची नीट मोकळी अशी चौकशी करता येत नव्हती, त्याला महाराजांनी परवानगी दिली असती तर त्याने सैनिकी खाक्या दाखवून एका प्रहरात प्रकरण संपविले असते.
"वावा, तुझे लक्षच नाहीये, केतकीविषयी बोलत असूनही. वावा.
तीन - तुरंगरंगांचा रथ. महाराजांच्या अस्वस्थतेचा याच्याशी असा संबंध असू शकतो, की महारजांचा रथही असाच दोलायमान झाला असेल, पण रथशालेतून मिळालेल्या माहितीनुसार, महाराजांच्या रथ व्यवस्थित होता. तुरंगरंगांविषयकच्या नोंदीतही काही विशेष वेगळे सापडले नाही.
चार - मुख्यसारथी शतांगनाथ. 
शतांगनाथ यांच्या सर्व नोंदी मी तपासल्या आणि मला क्षमा कर बभ्रू पण त्यांचे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. महाराजांच्या एवढ्या नित्यसहवासातील व्यक्ती, फार मोठा धोका आहे हा, तुमचे गुप्तहेर खाते खूपच..." - प्रखरमित्र काही बोलणार तेवढ्यात बभ्रूबाहू म्हणाला - "शतांगनाथ हे मणिनारचे हेर आहेत, गेली दहा वर्षं"
"ओ ओ ओ, आता कळाले मला, साक्षात बभ्रूबाहू हे एवढ्या शांतपणे सांगत आहेत त्याअर्थी, शतांगनाथ हे मणिनारचे हेर आहेत, असा मणिनारचा समज करवून देण्यात आला आहे., वावा". प्रखरमित्राच्या या कौतुकावर बभ्रूबाहूने स्मितहास्य केले व म्हणाला - 
"मला आशंका आली होतीच की तुझ्यासमोर ते जास्त माहिती देणार नाहीत म्हणून मी त्यांची परत भेट घेतली. तेव्हा त्यांच्याशी सविस्तर बोलणे झाले. त्यात मला विशेष काही नवीन माहिती मिळाली नाही. शतांगनाथ काहितरी लपवत आहेत हे नक्की, माझ्या प्रश्नांना उत्तरे देताना मला त्यांची द्विधा मनस्थिती जाणवली, कदाचित ते ठरवू शकत नाहीयेत की आपल्याला अधिक माहिती द्यावी का नाही याबाबत"
दोघेही थोडावेळ शांत बसले, बभ्रूबाहू उठला आणि त्याच्या घोड्यावर चढला.
"उद्या पहाटेच आपण सुरभिवनात जावू" - दोघेही एकदम म्हणाले, आणि त्यांचे चेहरे आनंदले, त्यांना समस्येची उकल झाली नव्हती पण दोघांचे पुढील विचार एकच असल्याने उगाचच आपण लवकरच हे कोडे सोडवू असा आत्मविश्वास आला. 
*

बुटक्या प्रखरमित्राने एक उंच उडी मारून आपल्या काळ्याशार घोड्यावर मांड ठोकली व भरधाव वेगात वायव्येकडे जावू लागला, बभ्रूबाहूच्या शीळेला त्याने हात वर करून उत्तर दिले. अर्ध्या प्रहरापेक्षा कमी वेळेतच ते सुरभिवनाच्या सीमाप्रवेशद्वारापाशी पोहोचले. असे अचानक बभ्रूबाहूला पाहून प्रवेशद्वाराजवळील रक्षक गडबडले. बभ्रूबाहूने त्यांच्याकडे तीव्र कटाक्ष टाकला आणि म्हणाला - प्रखर तो हो पुढेच, आलोच आहे तर जर येथील सुरक्षेचे नीट सर्वेक्षण करतो. प्रखरमित्राने जलाशयापाशी घोड्यावरुन खाली उडी मारली, त्याला गवतापाशी सोडून जलाशयापाशी तो हातपाय धुवून पाणी पिऊ लागला. बभ्रूबाहू आल्यावर त्यानी प्रवेशद्वाराजवळील रक्षकांबरोबरील संवाद प्रखरमित्राला वनरक्षकांकडून त्याला बरीच उपयुक्त माहिती मिळाली होती. थोड्याच वेळापूर्वी राजकन्येची परमसखी केतकीला त्वरेने जाताना पाहिले होते. सुरभिवनाच्या विरुद्ध बाजूला मणिनारच्या सीमेजवळील सैन्यात जाणवण्याइतपत वाढ झाली होती, सीमेजवळील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात डागडुजी करण्यात येत होती. पण मणिनारसह सर्वच राष्ट्रे बल्कराष्ट्राच्या वाढत्या दहशतीपायी सैन्यसज्जतेत वाढ करत होती, त्यामुळे यात नवल काहीच नव्हते. बभ्रूबाहू आणि सैनिक यांच्यात याविषयीही बरीच जास्त चर्चा झाली होती. 
"बभ्रू, तू मनमोकळेपणाने सामान्य सैनिकांशी अशा विषयांवर संवाद साधतोस हे मला खूप आवडते" - प्रखरमित्राकडून ही प्रशंसा ऐकून बभ्रूने स्मितहास्य केले. दोघांनी एकत्र भोजन केले व आजूबाजूच्या भागाची पाहणी करु लागले, वनासारखे वन होते, खूपच नयनरम्य परिसर होता. येथील निरिक्षण संपले अशाअर्थी एकमेकाकडे बघून, माना डोलवून दोघे शिवालयाच्या रस्त्याने टेहळणी करत करत निघाले. शिवालयापाशी परत घोड्यावरून उतरून आजूबाजूला फिरू लागले. प्रखरमित्र शिवालयाच्या गाभार्‍यात जावू लागला. जाता जाता शिवालयाबाहेरच उभ्या असलेल्या बभ्रूबाहूकडे बघून जोरात ओरडला  - "मातेची आठवण येते आहे का बालकाला?" आणि हसत हसत आत गेला. अर्धी प्रदक्षिणा घालून परतताना प्रखरमित्राने बभ्रूला जोरात हाक मारूनच सांगितले की तो थोडा दूरवर जावून येत आही. तो मागे न वळता मणिनार सीमेच्या दिशेने तसाच थोडा पुढे गेला. बराच वेळा जमिनीवर काळजीपूर्वक वेगळॆ काही सापडते आहे का ते शोधल्यायावर त्याला काचेचा एक मणी मिळाला. त्याने असा असाधारण मणी आजवर पाहिला नव्हता, तो जणू एक स्फटीकाचा तुकडाच होता, प्रकाशात धरला तर प्रकाश असा आरपार जात होता की जणू तो मणी अस्तित्वातच नसावा. समोर पाहिले तर, बभ्रू आणि त्याचा घोडा तिथे आनंदात गवतात फिरत होते. मणी झेलत तो परत आला. त्याला बघून बभ्रूबाहू म्हणाला - "मित्रा, पूर्ण प्रदक्षिणा घालून अपमान करण्यापेक्षा प्रदक्षिणा न घातलेलीच बरी". प्रखरमित्राने बभ्रूबाहूला मणी दाखविला. बभ्रूबाहूने मण्याचे पूर्ण निरीक्षण केले, वरखाली बघून, उंच प्रकाशाच्या दिशेने धरून पाहिला, व अखेर उत्तरला - "काही अंदाज बांधता येत नाही कसला मणी आहे त्याबाबत. 
बर...प्रखर तू मणी शोधत होतास तेव्हा मला शिवालयाजवळ शतांगनाथ दिसले, त्यांच्याएकूण वावरावरून ते गुप्तरित्या येथे आले होते असे दिसते. त्यांच्या हातात एक करडे पीस दिसले मला. शतांगनाथांचे असंख्य पक्षी हेरगिरीचे काम करतात, श्यामकिर तर बरेचदा मला त्यांचे सांकेतिक भाषेतील निरोप पोहचोवतो. शतांगनाथ नक्कीच काहितरी लपवत आहेत. कदाचित त्यांना सेनापतींनी आपल्यासारखेच काही शोधायला पाठविले असेल, कदाचित...". बभ्रूबाहूने शून्यात नजर लावली होती आणि डोळे एवढे छोटे केले होते की ते कदाचित प्रखरमित्राच्या पिचपिच्या डोळ्यापेक्षाही छोटे झाले असतील.
प्रखरमित्र म्हणाला - "एकाच सप्ताहात केतकी, तुरंगरंग, शतांगनाथ, आपण सर्वजण सुरभिवनात काहितरी शोधत आलो याचा अर्थ प्रकरण गंभीर आहे हे निश्चित."
थोडावेळ तिथे अजून काही वेगळे दिसते का याचा शोध घेवून ते परत नगराच्या दिशेने दिसू लागले.
प्रखरमित्र - "शिवालयाच्या पुढे आपले किती रक्षक आहेत"
बभ्रूबाहू - "जास्त नाहीत, साधारण दहा ते बारा. यापुढे बरेचसे निबीड अरण्य आहे. शिवालयापाशी आपण आलो तो चिंचोळा मार्ग ग्रीवनारमधून येतो आणि असाच पुढे मणिनारमधे जातो. थोडेसे पुढे गेल्यावर जवळच आपले व मणिनारचे संयुक्त सेनालय आहे. मणिनारचेही साधारण दहा सैनिक असतील."
प्रखरमित्र - "बभ्रू, मी दोन महिन्यांपूर्वी संयुक्त परिषदेच्या निमित्ताने सुरभिवनात आलो होतो मला मणिनारचे सीमेजवळील रस्ते उत्तम स्थितीत आढळले होते. मला वेगळीच शंका येते आहे. तुला प्रतिशत खात्री आहे का की सुरभिवनात मायेचा प्रभाव नाही. कितीही झाले तरी मी ग्रीवनारमचे परत येवून वर्षभरसुद्धा झाले नाही."
बभ्रूबाहू - "शिवायलाच्या जवळ माया असली तरी ती सिद्ध होवू शकत नाही. आणि पूर्ण ग्रीवनारच्या सीमेअंतर्गत माया नाही हे मी निश्चित सांगू शकतो. पण मणिनारने हळूहळू त्यांच्या प्रदेशात माया सिद्ध करायला अनुमति देणे सुरू केले आहे, बल्क राष्ट्राच्या दहशतीला हेच एक उत्तर आहे असे महाराज पंगमणि यांना वाटते. बाबांबी मला बरेचदा ओझरते सांगितले आहे की शिवालयाजवळील अनौपचारिक भेटीत पंगमणि आणि महाराजांनी यावर बरेचदा वार्तालाप केला आहे. मणिनार व आपण यांच्या शांतता कराराच्या नूतनीकरणात हाच महत्वाचा मुद्दा असणार आहे. तुला कल्पना असेलच मायेचे मूळ आपल्या दोन देशातच आहे. बाहेर कितीही दाखविले तरी ग्रीवनार माया विसरणार नाही, आणि तशी वेळा आलीच तर महा देवी अभिधर्वा...असो."
प्रखरमित्र - "ह्म्म....आपल्याला मिळालेल्या या नवीन माहितीचा, सापडलेल्या मण्याचा आणि महाराजांच्या समस्येचा काही संबंध आहे का नाही ते कळणे अवघड आहे पण आपल्याकडे आत्ता तरी काही उत्तर नाही. उद्या परत सोमवार आहे, महाराज..."
बभ्रूबाहू - "नक्कीच नियमीत येतात तसे ते येणार, चल आपल्याला लवकर नगरीत पोहोचले पाहिजे, उद्या साप्ताहिक विश्राम असल्याने आज मला नगरातील सर्व व्यवस्थेचे नीट बघितले पाहिजे."
प्रखरमित्र - "ठीक. मी हा मणी सध्या
 माझ्याजवळ ठेवतो, नगरीत कोषागारातील विशेषज्ञांकडून हा नैसर्गिक आहे का कृत्रिम, कुठे बनविला असेल, कशासाठी असेल वगैरे सर्व माहिती घेतो, आज आपण संध्याकाळीच माझ्या घरी भेटू"
*

सुरभिवनातून आल्यावर प्रखरमित्र मणी घेवून ताबडतोब कोषागारात त्याचा मित्र सूर्यपैलूकडे गेला. "मी तुला खात्रीने सांगू शकतो की हा मणी मौल्यवान अजिबात नाही, तो निव्वळ काचेचा आणि कृत्रिमरित्या बनविलेला आहे पण यावरची कारागिरी अतुलनीय आहे, याचा नकीच काहीतरी उपयोग आहे, पण काय ते लक्षात येत नाहिये." - सूर्यपैलूचे वाक्य पूर्ण होता होता, प्रखरमित्राने जवळजवळ त्याच्या हातातून मणी हिसकावला आणि म्हणाला - "कुठे बनवला असेल हा?".  याच्यावरच्या पैलूंवरून मी खात्रीने सांगू शकतो की हा एकतर बल्कराष्ट्रात तयार करण्यात आला आहे किंवा, बल्कराष्ट्रातील कोणीतरी तयार केला आहे". प्रखरमित्र मणी घेवून लगबगीने त्याच्या कार्यालयात गेला आणि त्याने बल्कराष्ट्राबरोबर केलेल्या सर्व व्यवहारांच्या नोंदी आणयला सांगितल्या. मुळात बल्कराष्ट्राशी चक्रतलावरील दोन वा तीन राष्ट्रेच व्यापार करत. ग्रीवनार अन्नधान्याच्या बदल्यात त्यांच्याकडून सुवर्णमुद्राच घेत असे. हीच माहिती नोंदीवरुन अधोरेखित झाली. बभ्रूच्या विचारांची शृंखला आता पटपट पुढे सरकू लागली होती - "हा एक सामन्य मणी चोरुन ग्रीवनारमधे आणण्यात आला आहे. एकच पर्याय आहे - हे सर्वश्रुत आहे की राजकन्येची सखी बल्कराष्ट्राची भावीवधू आहे, कदाचित तिच्याकरवी हा मणी येथे आणण्यात आला असेल. केतकीची भेट घेतली पाहिजे पण ती भेटणार कशी, राजप्रासादात असे अचानक जाणे योग्य नाही." प्रखरमित्र हा विचार करत होता तोपर्यंत त्याला मधुर आवाज ऐकू आला - " बभ्रूबाहू, सेनालयात नाहीत व त्यांच्याघरीही नाहीत, ते कोठे भेटू शकतील?". केतकीला बघून प्रखरमित्राला बभ्रूबाहूपेक्षाही जास्त आनंद झाला. तो म्हणाला - "सप्ताहाखेरीस ते कामकाजात खूपच व्यस्त असतात, काही विशेष काम असले तर मला भेटतील तेव्हा मी त्यांना निरोप देवू शकतो". केतकीने क्षणभर इकडेतिकडे पाहिले व म्हणाली - "सोमवारी...अं म्हणजे....उद्या सायंकाळी ते मला संध्यासमयी भेटू शकतील का विचारायचे होते, काम नव्हते काही, तुम्ही नाही दिला तरी चालेल निरोप." प्रखरमित्र हसत म्हणाला - "नक्कीच भेटतील, मी त्यांना निरोप देतो, निश्चिंत असा, बर..मला आपल्याला दोन गोष्टी विचारयच्या होत्या...". प्रखरमित्राने त्यांना एप्रिलविषयी विचारले. केतकीने खात्रीने व प्राणाशप्पथ सांगितले की - जाणते वा अजाणतेपणी देवी एप्रिल ग्रीवनारमधे वाममार्गाने काही वस्तू आणणार नाहीत. देवी एप्रिल, आपल्या राजकन्येच्या अक्षरश: भक्त आहेत. प्रखरमित्राने केतकीला तिच्या सुरभिवनातील भेटीविषयी विचारले तेव्हा तिने - "वनरक्षकांना भास झाला असेल" असे उत्तर दिले व तातडीने निघून गेली. केतकी आली तशी पटकन निघून गेली. प्रखरमित्र विचार करू लागला - हा मणी ग्रीवनारमधे आला कुठून. कदाचित तो शिवालयापाशी वर्षानुवर्षे पडून असेल असे म्हणावे तर तो एवढा स्वच्छ आहे की तो नक्कीच त्या जागी जास्त दिवस नसावा. याचा उपयोग काय?" तो गहन विचारात गढला, आणि आपसुकच करंगळीचे नख खावू लागला. हे प्रकरण नक्कीच गहन आहे प्रथमपासूनची सर्व माहिती सुसूत्र मांडू, सत्य लक्षात यायला वेळ लागणार नाही. मण्याशी खेळता खेळता त्याने तो डेर्‍यातील पाण्यात टाकला, तर आश्चर्य म्हणजे त्यातून बुडबुडे येवू लागले, त्याने मणी प्रकाशात धरून पाहिला तरी कोठे छिद्र दिसेना. त्याने विचार केला - छिद्र खूपच सूक्ष्म असावे, अगदी मुद्दामून केल्यासारखे. अर्ध्या तासाने तो खाडकन जागीच उभा राहिला - "ओहोहोहो, काय सोप्पा प्रकार आहे सगळा. हा मणी नाही ही तर कुपी आहे, यात सीमेलगत रस्ते नाहीत ते तर प्रसव्यमार्ग आहेत, केतकीला आलेला मंद सुवास, असे प्रशिक्षण एकच व्यक्ति देवू शकते...म्हणजे काय अर्थातच. आणि काय काळजीपूर्वक योजना आखली आहे, वावा". त्याने डेर्‍यातले दोन भांडी पाणी गटागटा प्यायले आणि घोड्यावर बसून भरधाव निघाला. संध्याकाळ झाली होती, त्याने थेट आपले घर गाठले, प्रवेशद्वारापाशी त्याला कोणाचीतरी चाहूल लागली आणि तो सावध झाला. त्याने हळूच मागील द्वाराने प्रवेश करायचे ठरविले, पण क्षणभरातच त्याच्या मानेच्या दिशेने एक तीर आला, त्याने झपक्क्न खाली बसून तो चुकवला, तोपर्यंत समोरून दोन करड्या वेषातील सैनिक येताना दिसले. मुख्य द्वारापाशी दोन, इथे दोन, आणि दूरवर एक धनुर्धारी  - प्रखरमित्राला निकराची लढाई लढायला लागणार हे लक्षात आले. त्याने पटकन झाडावर उडी मारली आणि पटपट झाडात गुप्त झाला. त्याची आणि बभ्रूबाहूची लढायची ही आवडती निती होती. त्या झाडाच्या फांद्यावरुन तो थेट घरात उतरला. स्वत:च्या घरात आल्यावर तो युद्धात जरी तो हरला तरी सहजी हरणार नव्हता. सहा शत्रू सैनिकांनी घरात धाव घेतली. प्रखरमित्राने चापल्या दाखवत धावणे सुरू केले आणि बरोबर वेळा साधून एकेक सैनिकावर 
वार केले. चार शत्रूसैनिक जायबंदी झाले, कदाचित ते मरणही पावले असतील परंतु शेवट प्रखरमित्र अंगणातील कोपर्‍यात अडकला आणि उर्वरीत दोन सैनिक त्याच्यावर वार करून धावून आले. त्याने एका सैनिकाच्या वर्मी घाव केला पण तोवर उरलेल्या शत्रूसैनिकाच्या तलवारीच्या घावाने त्याची करंगळी तुटली. त्याला प्रमाणाबाहेर वेदना झाल्या, दुसर्‍या हाताने मूठ घट्ट आवळून तो कोलमडला, त्याला उरलेला एक सैनिक आणि शतांगनाथांचा चेहरा दिसला आणि त्याची शुद्ध हरपली.
*

सप्ताहाखेरीसचे सर्व व्यवस्थापन संपवून संध्यासमयी बभ्रूबाहू, सुरभिवनातील प्रकरणाचा विचार करत सेनालयाबाहेर उभा होता तेव्हा त्याला समोरील झाडावर निळा पोपट दिसला. श्यामकीर आत्ता? त्याने शीळ वाजवून श्यामकीरला जवळ बोलावले. त्याच्या पायाला बांधलेला पांढरा दोरा सोडवला आणि अश्वारुढ होवून तो भरधाव चंद्रवाटीकेकडे निघाला. थोड्याच वेळात तो चंद्रवाटीकेतील नेहमीच्या वृक्षापाशी जावून त्याने शतांगनाथ दिसतात का ते पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. आजूबाजूला नीट बघता बभ्रूबाहूला झाडाच्या खोडावर तलवारीने कोरलेले "X१X" असे चिन्ह दिसले, आणि त्याखाली रक्ताचे डाग. बभ्रूबाहू क्षणभर दचकला, पण लगेच सावरुन तो स्वत:शीच पुट्पुटला - आता एक पळभरही उशीर करुन चालणार नाही, महाराजांच्या जीवाला धोका? सर्वप्रथम बाबांना आणि सैन्याला सचेत केले पाहिजे, आणि शतांगनाथ?". कमरेच्या शंखाला हात जातो तोवर त्याच्यावर चारीदिशांनी बाणाचा वर्षाव सुरु झाला, त्याच्या उजव्या मनगटाला घासून एक बाण गेला पण त्याच्या शंखाचा चक्काचूर झाला. त्याच्या ड्याच्या मानेत सप्पकन तीनचार बाण एकदम घुसले. झाडाचा आडोसा सोडून पळणे म्हणजे जीवावर पाणी सोडण्यायोग्यच होते, पण त्याला काहितरी करणे भागच होते. श्यामकीर ! विचार करायचा अवकाश आणि श्यामकीरची आर्त शीळ ऐकू आली. अश्रू आणि श्वास रोखून बभ्रूबाहूने पटकन कमरेचा धूम्रकोष जमिनीवर आदळला, निर्माण झालेल्या धूराच्या लोटातच तो धावू लागला. सूर्यास्ताचा फायदा घेवून तू धनुर्धारी शत्रूला चुकवून लगेचच राजप्रासादापाशी पोचला असता. पण नगरीच्या दिशेला वाटेत पूर्ण करड्या वेषात, काळ्या अश्वावर तलवारधारी सहा सैनिक शांतपणे त्याची वाट बघत उभे होते. बभ्रूबाहूने झटकन परिस्थितीचे संपूर्ण आकलन केले - वाटिकेतून बाहेर पडायच्या सर्व वाटा अडवल्या गेल्या आहेत, बाहेर पडायचे म्हणले तर सैनिकांशी सामना अटळ आहे, तो कितीही शूर असला तरी एकावेळी जास्तीत जास्त दोन जणांशीच लढू शकला असता. चंद्रवाटीकेतून बाहेर पडणारे सर्व मार्ग चांगलेच रुंद होते. वाटिकेच्या आतच थांबायचे म्हणले तर त्याला सहज शक्य होते. दाट वृक्षांचा आधार घेवून त्याला शत्रूशी लढता येणारं होतं. शिवाय सुर्योदय होताच शत्रूला पलायनाची तयारी करणं भाग होतं. जेव्हा शतप्रतिशत मरण अटळ आहे तेव्हा दुसर्‍या पर्यायाचाच विचार केला पाहिजे असे ठरवून त्याने वाटिकेत लपून लढायचा निर्धार केला व तो क्षणार्धात वाटीकेत लुप्त झाला. हानि एकच होवू शकली असती ती म्हणजे रात्रीतच महाराजांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले तर, पण राजप्रसादाच्या सुरक्षेची जबाबदारी सेनापती शारबाहूंवर होती त्यामुळे त्याबबतीत तो निश्चिंत होता. तो पटकन एका झाडावर चढला आणि शांतपणे विचार करत बसला. लगेच प्रतिहल्ला करण्यात काही अर्थ नव्हता, थोडा वेळ गेल्यावर अचानक हल्ला करणे जास्त लाभदायक होते. तासाभर शांतपणे थांबल्यावर त्याला सर्व प्रकरण हळूहळू लक्षात आले - महाराजांच्या जीवाला धोका होता पण तो सुरभिवनात. महाराज प्रात:समयीच सुरभिवनासाठी प्रस्थान करणार होते आणि बाहेरील करड्या वेषधारी सैनिकांचा उद्देश बभ्रूबाहूला महाराजांपर्यंत पोहोचू न देणे हा होता. बभ्रूबाहू सूर्योदयाची आतुरतेने वाट बघत होता. त्याला प्रखरमित्राची, त्याहीपेक्षा त्याच्या एकमेकाला संदेश पोहोचवता येतील अशा उपकरणाच्या कल्पनेची जास्त आठवण येत होती.
*

सोमवारचा सूर्योदय झाला, प्रखरमित्राला जाग आली तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. आश्चर्यकारकरित्या त्याचा हात दुखत नव्हता. त्याने नीट डोळे उघडून पाहीले तर त्याच्या हाताला नीट औषध व श्वेतवल्कले लावली होती. त्याने निकराने स्वत:ला उठविले, शेजारी शतांगनाथ कण्हत होते, त्यांचे दोन्ही हात व पाय जखमेने भरले होते, त्यांच्याच शेजारी रात्रीचा करड्या पोषाखातील शत्रूसैनिक धारातीर्थी पडला होता. प्रखरमित्राने त्यांना पाणी पाजले व घाईत म्हणाला - "मी तुमच्यासाठी मदत पाठवतो पण मी थांबू शकत नाही मला आत्ता बभ्रूबाहूबरोबर सुरभिवनात गेले पाहिजे...", त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच शतांगनाथांनी त्याला खुणेने जवळ बोलावले आणि म्हणाले - "बभ्रूबाहू चंद्रवाटीकेत अडकला असेल, त्याला वाचव, आणि सुरभिवनात...". प्रखरमित्राने त्यांचे बोलणे थांबविले आणि म्हणाला- "चिंता करू नका, सुरभिवनात काय होणार आहे याची मला चांगलीच कल्पना आली आहे, मी बभ्रूला सोडवायला जातो.". प्रखरमित्र चंद्रवाटीकेकडे भरधाव निघाला, वाटीकेच्या द्वाराशीच त्याला रक्ताने माखलेला पणा चेहर्‍यावर हलकेसे हसू असलेला बभ्रूबाहू दिसला, तो जोरातच म्हणाला - "वेळेवर आलास, मला तुझा घोडा दे, मला सुरभिवनात जायचे आहे, महाराजांचा जीव धोक्यात आहे".
"नाही बभ्रू, महाराजांचा जीव नाही, राजकन्येचे अपहरण होणार आहे, माझ्यापेक्षा तू खचितच लवकर पोहोचशील, हे घे..." घोड्यावरून उतरतच प्रखरमित्र म्हणाला - "बभ्रू, सविस्तर सांगायला वेळ नाही, सुरभिवनात पोहोचताच दोन गोष्टी लक्षात ठेव, एक: तुरंगरंगाला शोधून जिवंत किंवा मृत कसेही पकडावे. दोन: राजकन्येला शिवायलात जाण्यापासून थांबवावे, तू पोचेपर्यंत त्या शिवालयात पोचल्या असतील तर कुठल्याही परिस्थितीत त्यांना घोड्यावर बसू देवू नकोस तशी वेळ आल्यास त्यांच्या घोड्याची हत्या कर." 
दुसरे वाक्य पूर्ण होताक्षणीच, बभ्रूबाहू कोसभर दूर पोहोचला होता. 
बभ्रूबाहू वीजेच्या वेगाने सुरभिवनात पोहोचला, महाराज व शारबाहू मृगयेला निघालेच होते. बभ्रूबाहूने सेनापतींना पहिल्या दोन सूचना जवळजवळ आदेशाच्या सुरातच केल्या, व शिवालयाकडे भरधाव निघाले. शिवालयापाशी राजकन्या प्रदक्षिणा पूर्ण करून त्यांच्या घोड्यावर बसत होत्या तेवढ्यात बभ्रूबाहूने "धनू, अश्वारुढ होवू नकोस..." अशी आरोळी ठोकली आणि त्याच्या तीराने घोड्याच्या कंठाचा वेध घेतला. बभ्रूबाहूला काही समजायच्या आतच त्याच्या दिशेने एक तीर आला, तो बाजूला झाला पण त्याच्या खांद्यात तीर घुसलाच. तो कोसळायच्या आतच राजकन्या व केतकीने त्यांच्या समोरील झाडीत बाण सोड्ले, आणि तिथून तुरंगरंगाचे कण्हणे ऐकू येवू लागले.  
*

महाराज विशालग्रीव यांनी सोमवारी दुपारी मणिनारबरोबरचा पस्तीस वर्षे जुना शांतताकरार एकतर्फी रद्द केला आणि मणिनारलगच्या सर्व सीमा बंद केल्या.
*

मंगळवारी प्रात:समयीच महाराज, महाराणी, राजकन्या, व पंचप्रधानमंडळ असे राजसभेत उपस्थित होते. महाराजांचे भाषण संपल्यावर, महाराणींनी, प्रखरमित्र व बभ्रूबाहू यांचा विशेष सन्मान केला. महाराजांनी एकवार पुंगमणींकडून आलेल्या क्षमापत्रांवर नजर टाकली नंतर बभ्रूबाहूच्या खांद्याकडे आणि प्रखरमित्राच्या करंगळी नसलेल्या हाताकडे बघून ते म्हणाले - "प्रखरमित्र, बभ्रूबाहू, शतांगनाथ यांनी दाखविलेल्या बुद्धिमत्तेला आणि पराक्रमाला तोड नाही. शतांगनाथ वज्र आहेत, एखाद्या पंधरवड्यातच ते धडधाकट बरे होवून सेवेत रुजू होतील असा आम्हाला विश्वास आहे. प्रखरमित्र, आज या विशेषसभेत सर्व उपस्थितांच्या मनात अनेक शंकाकुशंका आहेत तेव्हा माझ्या भेटीपासूनचा, कालच्या घटनेपर्यंत सर्व वृत्तांत आपण सांगितला तर सर्व शंकाचे निरसन होईल आणि पुढील निर्णय घ्यायला राज्यसभेतील प्रत्येकाकडे पुरेशी माहिती असेल. मला अर्थातच तुमचे विश्लेषण माहित तथा मान्य आहे, आपल्या राजदूतांनी व हेरांनीही त्याला पुष्टि दिली आहेच." प्रखरमित्र सर्वांना अभिवादन करून उभा राहिला. मागून बभ्रूबाहूचा बारीकसा आवाज आला- "कल्पना, भरकटणे नको". प्रखरमित्र घसा खाकरून बोलू लागला - 
"थोडक्यातच सांगतो, कुणाला काही शंका असल्यास कृपया माझे निवेदन झाल्यावर विचारा. राजकन्येच्या अपहरणाच्या प्रयत्नाला अनेक गोष्टींची पार्श्वभूमी आहे, ती आधी पाहू मग अपहरणाचा प्रत्यत्न नक्की कसा झाला ते पाहू. अनेक गोष्टी एकत्र आल्या, माझे मित्र बभ्रूबाहू म्हणतात तशी चक्रतलाच्या राजकीय पटलावरील परिस्थिती अतिशय नाजूक आहे. मणिनारला ग्रीवनारकडून कायमच सन्मानजनक वागणूक मिळाली आहे. परंतु पस्तीस वर्षांपूर्वीचा पराभव त्यांच्या अजूनही जिव्हारी लागला आहे हे निश्चित. माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यांची योजना अशी होती की, राजकन्या धनुग्रीवा यांचे स्वयंवराआधीच अपहरण करुन त्यांना राजपुत्र पिंगमणी यांच्याशी विवाह करणे भाग पाडायचे. तसेच याचा वापर शांतताकराराच्या नूतनीकरणावेळी ग्रीवनारवर दबाव टाकून जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी करायचा - माझ्यमते ग्रीवनार गिळंकृत करण्याच्या योजनेतील पहिली पायरी. दुसरीकडे बल्कराष्ट्राशी मैत्रीची बोलणी करून त्यांच्यातर्फे आपल्या इतर मित्रराष्ट्रांस शह द्यायचा. हा अंदाज बांधला होता स्वत: बभ्रूबाहू यांनी, राजदूतांनी व आपल्या हेरांनी त्यास पुष्टि दिली आहे."
प्रखरमित्राने, महाराजांकडे एकवार नजर टाकली तर त्यांचे ओठ हलकेसे हलत होते, प्रखरमित्राला आनंद झाला व त्यांनी प्रखरमित्राकडे बघून स्मितहास्य दिले. "आता अपहरणाच्या प्रयत्नाविषयी - कालच्या सोमवारच्या आधीच्या सोमवारी, महाराज नित्यक्रमाप्रमाणे सुरभिवनात गेले. राजकन्या धनुग्रीवा वनात त्यांच्या सखीसह घोड्यावरून रपेट मारायला गेल्या. काही अंतरावर त्यांनी घोड्याला सोडून त्या केतकीसमवेत वार्तालाप करत एका ठिकाणी थांबल्या, नित्याप्रमाणे साधारण अर्धा तास. अश्वपाल तुरंगरंग यांना कार्यक्रमाची चांगलीच माहिती होती. ते या अपहरणासाठी बराच काल तयारी करत होते. प्रथमश्व पूर्णपणे त्यांच्या ताब्यात असल्या कारणाने, त्यांना काय प्रशिक्षण द्यायचे ते सर्वस्वी त्यांच्यावर होते. तुरंगरंग यांनी अतिदुर्मिळ अशा हयगंधा वनस्पतिचा अर्क असलेल्या अनेक कुपी बल्कराष्ट्रातून मिळवल्या होत्या, अर्थात तस्करीने. अश्वांच्या प्रशिक्षणासाठी विविध गंधांचा वापर करतात हे आपणां सर्वांना माहितच आहे. हयगंधा वनस्पतीचा गुणधर्म असा की ती अश्वास पूर्ण संमोहित करते, हयगंधाच्या गंधामागे अश्व खेचला जातो, आपले स्वामी, परिस्थिती कशाचीही पर्वा न करता. परंतु तुरंगरंग यांच्यासारखे निष्णात प्रशिक्षक हयगंधाच्या योग्य वापर करून त्यांना एखादे काम व्यवस्थित पार पाडण्यास प्रशिक्षित करू शकतात. हयगंधाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या एका कणानेही श्वानाला प्रफुल्लित वाटते. अपहरणासाठी निश्चित झालेल्या सोमवारच्या आधीच्या सोमवारी तुरंगरंग यांनी अंतिम सराव करण्याचे योजले होते. अश्व राजकन्येच्या नजरेआड होताच त्यांनी दोन गोष्टी केल्या - एक: अपहरणाच्या दिवशी राजकन्येने भरधाव अश्वावरून उडी मारायचा प्रयत्न केला तरी त्या अश्वावरून पडू नयेत म्हणून क्षणार्धात त्याचे पधान बदलले. दोन: अश्वाला हयगंधेच्या मदतीने सीमेजवळ नेले इथपर्यंत त्यांचा सराव व्यवस्थित पार पडला. पण सराव संपल्यावर सीमेजवळाच त्यांना अश्वाला जुने पधान लावायला सुरु केले आणि तेव्हाच त्यांच्यावर कुणीतरी हल्ला केला त्या नादात त्यांच्या हातून हयगंधेची कुपी पडली. काल शतांगानाथांकडून मला कळाले की, सोमवारी सुरभिवनात राजपरिवार असताना त्यांचा प्रशिक्षित गरुड, पिंगलश्येन घिरट्या घालून सुरक्षेवर नजर ठेवत असे. सीमेजवळ राजकन्येच्या अश्वाची पधान बदलताना बघून त्याने तुरंगरंगांवर हल्ला केला. तुरंगरंगांनी एकाच वारात त्याची हत्या केली पण त्याआधी पिंगलश्येनने त्यांच्या पायाला नखाने मोठी जखम केली होती. तुरंगरंगांकडे पिगलश्येनचा देह नष्ट करायला साधारण अर्धा तास तरी होता. त्यांनी नक्की काय केले हे आपल्याला ज्ञात नाही. माझा एक सिद्धांत आहे पण अजून निश्चिती झाली नाही, सायंसमयीपर्यंत महादेवी अभिधर्वा तो बरोबर आहे का चूक सांगतील."
प्रखरमित्राने अभिधर्वांचे नाव घेताक्षणीच सर्वजाण सावरून बसले, सर्वांनी एकमेकाकडे कटाक्ष टाकून प्रतिक्रीयांचा अंदाज घेतला. "वेळेअभावी कुपी शोधायचा प्रयत्न न करता ते मंडपाजवळ परतले. माझा अंदाज आहे की ऐनेवेळेला त्यांच्या पायातून रक्त आल्याने त्यांनी रथ दोलायमान झाल्याचे कारण सांगून खाली वाकून ते पुसले किंवा तिथे काहीतरी बांधले असावे. तुरंगरंगानी प्रचंड वेदना सहन केल्यापण ते नगरीत कुणालाही काही कळू न देता पोचले. पिंगलश्येनच्या नियमित अंतराने सर्व ठीक असलेले सांगणार्‍या शीळा ऐकू न आल्याने शतांगनाथ अस्वस्थ होते, त्यांना तुरंगरंगांची कृती जरा विचित्र वाटली पण त्यांना तुरंगरंगांवर त्याक्षणी तरी काही संशय आला नव्हता. सोमवारपासून शतांगनाथ पिंगलश्येनचा अथक शोध घेत होते, त्यांना पिंगलश्येनचे एक पीस मिळाले तेही मणिनारमधून. शतांगनाथांना काहितरी कारस्थान योजिले जात आहे याची कल्पना आली होतीच. आम्ही शनिवारी त्यांच्याशी वार्तालाप केल्यावर तर त्यांची खात्रीच पटली. शनिवारी सर्वांशी बोलून बभ्रूबाहू आणि मला माहिती मिळाली होती पण त्याच्या विश्लेषणातून प्रकरणाचा अंदाज येत नव्हता. खरेतर आम्ही सर्वांशी शनिवारी वार्तालाप केला आणि कारस्थानाच्या यशासाठी आणि अपयशासाठी चक्रे वेगाने फिरू लागली. पुढील सोमवारची योजना धोक्यात येवू नये तुरंगरंग यांनी सुरभिवनात आल्यापासून तापाच्या कारणाने विश्रांती घेतली होती. पण आमच्याशी बोलल्यावर त्यांना अंदाज आला की त्यांची योजना धोक्यात येवू शकते म्हणून त्यांनी लागलीच सुरभिवनात जावून मणिनारला तसा संदेश पोहोचवला. आमच्याशी बोलल्यावर देवी केतकींनाही संशय आला होता त्यामुळे रविवारी त्याही सुरभिवनात गेल्या, पण वाटेत त्यांना तुरंगरंग दिसले आणि मग त्यांनी तुरंगरंगांचा पाठलाग केला. तुरंगरंगांना त्याची चाहूल लागली, त्यांनी हुशारीने आपला संदेश पोहोचवला आणि देवी केतकींना चकवून परतले. तुरंगरंगांच्या निरोपानंतर काही कालावधीतच मणिनारचे करडे वेषधारी अनेक योद्धे ग्रीवनारमधे आले. साधारण पंधरा योद्धे. हे योद्धे कोठून आले त्याचाही सिद्धांत बरोबर का चूक याचा महादेवी अभिधर्वा शोध घेत आहेत. त्यांचे काम एवढेच होते की बभ्रूबाहू व मला काही केल्या सोमवारचा महाराजांच्या सुरभिवनाचा कार्यक्रम बदलू द्यायचा नाही. रविवारी सुरभिमवनातून परतल्यावर मला तो मणी म्हणजे हयगंधेची कुपी आहे हे समजायला थोडासा अवधी गेला. खरेतर आधी लक्षात आली पाहिजे होते. शतांगनाथांना त्यांच्या मणिनारमधील हेरांकडून सोमवारी काहितरी महत्वाचे घडणार असल्याची वार्ता मिळाली व त्यांनी ती सेनापती व बभ्रूबाहूंना द्यायला पीतकीर व श्यामकीर या त्यांच्या पक्षीदूतां पाठविले. राजप्रसादातील रस्त्यांकडे मणिनारच्या योद्ध्यांचे लक्ष होते व त्यांनी पीतकीरला वाटेतच मारले. सुदैवाने श्यामकीरचा निरोप बभ्रूबाहू यांना मिळाला व ते चंद्रवाटीकेकडे निघाले. थोड्याच अवधीत श्यामकीरचाही जीव गेलाच. शतांगनाथ चंद्रवाटीकेत वाट पाहत उभे असतानाच त्यांच्यावर मणिनारच्या योद्ध्यांच्या पहिल्या तुकडीने हल्ला केला. त्यांनी घाईघाईतच बभ्रूबाहूंना वृक्षावर सांकेतिक निरोप ठेवला व योद्ध्यांना चकवून माझ्या घरी अगदी योग्य वेळी आले - म्हणून माझ्या प्राणांचे करंगळीवर निभावले. एव्हाना ढोबळ कारस्थान माझ्या व बभ्रूच्या लक्षात आले होते मग पुढे सोमवारी काय घडले ते आपण सर्वजण जाणताच."
प्रखरमित्राने क्षण्भर विश्रांती घेतली, महाराजांनी खूणेनेच एक तबक प्रखरमित्रापुढे केले, त्याने आनंदाने त्यातील चिघळविंथ तोंडात घातले. क्षणभराच्या शांततेनंतर पंचप्रधानातील एक प्रधान, देवी दग्धकेशांनी प्रश्न विचारला - "प्रखरमित्र खरच, आपल्या तिघांचे कर्तृत्त्व अद्भुत आहे, मला एका प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही - महाराजांना अस्वस्थ का वाटत होते.?". महाराज, बभ्रूबाहू आणि प्रखरमित्र हसू लागले. महाराज म्हणाले - "बभ्रूबाहूचे आणि आमचे याबाबत एकमत नाही आहे. प्रखरमित्र यांनी कालचा पूर्ण दिवस याचे उत्तर शोधाण्यात घालवला. परत येताना तुरंगरंग यांचा रथ नेहमी आमच्या रथापुढे असतो आणि माझ्या आसनावरून मला त्यांच्या रथाचे अश्व दिसत. त्यांच्या रथाला नेहमी सलग दोन श्वेत आणि मग दोन कृष्ण अश्व असे बांधले असत. तुरंगरंगांनी त्यादिवशी गडबडीत किंवा वेदनेमुळे म्हणा एक श्वेत आणि एक कृष्ण अश्व असे लावले होते त्यामुळे आमच्या नजरेत नेहमीपेक्षा वेगळे दृष्य आले, तेव्हाच लक्षात आले पाहिजे होते आम्हांस. त्याशिवाय नियमित अंतराने पिंगलश्येमची शीळ ऐकू येत नव्हती, त्यामुळे एकूणात आम्हाला आजा काहितरी वेगळे आहे असे वाटू लागले"
सर्वांचे समाधान झाल्यासारखे वाटलं, 
प्रधान नीलकंठ म्हणाले - " पण महाराज पंगमणि असे करू शकतात याच्यावर अजून विश्वास बसत नाही"
महाराज म्हणाले - "महाराज पंगमणि नाही तर राजपुत्र पिंगमणी म्हणा. मणिनारचे काय करायचे हे आपण संध्याकाळच्या सभेत ठरवू, आत्ता बभ्रूबाहू व प्रखरमित्र यांना विश्रांती देणे श्रेयस्कर".२ 
"क्षमा करा महाराज, त्याआधी एक अंतिम प्रश्न", प्रधान नीलकंठ म्हणाले - "राजकन्या धनुग्रीवा यांचे अपहरण करुन सुरभिवनाच्या सीमेपलिकडे त्यांना जरी नेले असते तरी पुढे मणिनारच्या नगरीपर्यंत पोचताना, सुरभिवन संपल्यावर वाटेत सीमेवर अनेक छेदमार्ग असे आहेत जिथून आपल्या सैन्याने हल्ला करून सहजच देवींना सोडवले असते."
महाराज म्हणाले - "प्रखरमित्रांनी याचा शोध घेतला आहे, सुरभिवनालगत मणिनारने प्रसव्यमार्ग१ बांधले आहेत." भयचकित अवस्थेतच पंचप्रधान उठून उभे राहिले.
*

प्रखरमित्राने राजकन्येस अभिवादने केले - "नमस्कार देवी धनुग्रीवा"
राजकन्याने हसून त्यांना बसावयास सांगितले - "प्रखरमित्र, खरेतर आपले धन्यवाद द्यायला मलाच आपली भेट घ्यायला यायचे होते, पण केतकीकडून तुमची भेटायची ईच्छा आहे हे समजले म्हणून आपणांसच बोलावले"
प्रखरमित्र हसला - "क्षमा असावी देवी, अपहरणाबाबत आपणास काही प्रश्न विचारले तर आपण क्रोधित तर नाही होणार ना"
धनुग्रीवा - "प्रश्नांवर अवलंबून आहे ते"
प्रखरमित्र - "देवी आपण रविवारी सुरभिवनात का गेला होता?"
धनुग्रीवा - "प्रसव्यमार्ग मणिनारमधे कुठे निघतात ते बघावयास. प्रखरमित्र, प्रखर म्हणाले तर चालेल ना? आपल्याला लेखापालपद सोडून आमच्यासाठी पूर्णवेळ विश्लेषक म्हणून कार्य करण्यास आवडेल का?"
प्रखरमित्र - "देवी तुमचे ऋद्धिगोत्र कळाल्याशिवाय मी हा निर्णय घेवू शकत नाही"
धनुग्रीवा - "आणि ते आम्ही कोणास कळू देवू शकत नाही"
प्रखरमित्र - "पण देवी तुम्हाला आधीच सर्व माहित होते तर आपण सोमवारपर्यंत हे सर्व का होवू दिले"
धनुग्रीवा - "मला माझे अपहरण होवू द्यायचे नव्हते असे का वाटते आपणा सर्वांना?"
प्रखरमित्र - "ओ, म्हणजे राजपुत्र पिंगमणींच्या योजनेत तुम्ही सामील होता?"
धनुग्रीवा - "पिंगमणी, हा हा हा, तो काय असल्या योजना रचणार. तो तेवढा शूरही नाही आणि बुद्धिमानही नाही. पिंगमणीशी विवाह करायला मला नक्कीच आवडेल. मणिनारवर ताबा मिळवायचा तोच एक मार्ग आहे आणि जोपर्यंत मणीपुष्याने मला पूर्णापणे 

ओळखले नाही तोपर्यंतच वेळ आहे माझ्याकडे"
प्रखरमित्र - "देवी..."
धनुग्रीवा - "तुम्ही मला धनुर्भूवी म्हणालात तरी चालेल. तुम्हाला ज्याक्षणी वाटेल त्याक्षणी तुम्ही कार्यमुक्त होवू शकता अशी अनुज्ञा दिली तर माझ्यासाठी विश्लेषक बनाल?"
प्रखरमित्र - "नाही देवी, धनुर्भूवी"
धनुग्रीवा - "हात दाखवा तुमचा"
प्रखरमित्र - "देवी...."
धनुग्रीवा - "बभ्रूला यातील काही कळू देवू नका आणि मणिनार व ग्रीवनार सोडून कोठेही जावू शकता तुम्ही"
प्रखरमित्र - "अर्थातच"
***

१. प्रसव्यमार्ग - "reverse proxy" हे या कल्पनेचे मूळ आहे.(https://www.nginx.com/resources/admin-guide/reverse-proxy/) एकाच सर्व्रर/पोर्टवरील ट्रॅफिक आपण आपल्या नियमांनुसार वेगवेगळ्या अपस्ट्रीम सर्वर/पोर्टवर पाठवू शकतो तसा प्रकार. 
प्रसव्यमार्ग आणि भुयारात साम्य असले तरी प्रसव्य मार्ग हे मायावी असतात. प्रसव्यमार्ग ठरवताना प्रथम बद्धबिंदू ठरविला जातो. आणि नंतर एक किंवा अधिक विसर्गबिंदू. मायेचे अधिकारी बद्धबिंदूपाशी मायेने आणि उपलब्ध भौतिक साधनांने (उदाहरणार्थ, त्या बिंदूपाशील चौकोनातील हवा, माती) बंधनमिती तयार करतात. साध्य डोळ्यांना ही मिती दिसत नाही. बंधनमिती कायम सुरु नसते, ती activate कधी करायची ते मिती बांधतानाच्या नियमानुसार ठरते किंवा मिती बांधणारी अधिकारी तिला पाहिजे तेव्हा मिती activate करू शकते. बंधनमिती एकदा activate केली कि तिच्या हद्दीत येणारे सारे प्राणी, पक्षी, वस्तू तिच्या अवकाशात अडकतात. बघणार्‍यास जणू वाटावे की त्या बिंदूपाशी जावून लुप्त झाल्या. प्रत्यक्षात त्या वस्तू त्याच ठिकाणी मात्र वेगळ्या space-time मधे असतात. बंधनमितीच्या क्षमतेनुसार त्यात पाच ते दहा तास तरी वस्तूंना अडकवून ठेवता येवू शकते. बंधनमितीप्रमाणेच प्रत्येक विसर्गबिंदूपाशी विसर्गमिती बांधली जाते, बंधनमितीमधे अडकावलेल्या वस्तू निर्धारीत नियमांनुसार किंवा परत अधिकार्‍याच्या मर्जीनुसार कुठल्याही एका विसर्गमितीतून सोडवता येतात. मायेची उच्चकोटीची अधिकारी व्यक्ती, विसर्गमितीतून बंधनमितीतही उलटे येवू शकते.
मणिनारने सुरभिवनातून त्यांच्या सीमेनजीक लगेच एक बंधनमिती बांधली होती, तिला मणिनारच्या राजधानीत अनेक विसर्गमिती होत्या. राजकन्येला धनुग्रीवाला, राजकन्या मणीपुष्या यांच्या महालाजवळील वाटिकेतील विसर्गमितीतून बाहेर आणायाचे ठरले होते.
पिंगलश्येन प्रसव्यमार्गतूनच लुप्त झाला तर मणिनारचे कडवे सैनिक प्रसव्यमार्गतूनच ग्रीवनारमधे शिरले.

२. संध्याकाळाच्या सभेत "पश्चातदर्शी बोध आकलन" करण्यात आले. प्रखरमित्राने त्यासाठी सादर केलेल्या अवहालातील महत्वाचे मसुदे खालीलप्रमाणे (जे आता प्रखरनिती मधे संकलित आहेत)
अ. राजाने कुठलाही कार्यक्रम नियमित ठेवता कामा नये
ब. राजाच्या नित्य सहवासातील लोक, दुसर्‍या राजाच्या नित्य सहवासात येता कामा नयेत. (तुरंगरंग का फितले?)
क. राजाने इतर मित्र वा शत्री राजांशी अनौपचारीक भेट घेवू नये
ड. अधिकृतरित्या कोणत्याही राज्याने त्या राज्याकडून माया प्रथम वापरण्यात येणार नाही असे धोरण ठरवू नये.
इ. राजाच्या नित्यकार्यांसाठी लागणार्‍या सेवकांची कामे वरचेवर बदलण्यात यावीत.

Monday, February 20, 2017

चिन्मय शंकर


चिन्मय शंकर पाटील.
मला सरांचा पुढचा प्रश्न काय असेल याचा अंदाज होता - कुठल्या शाळेतून आलास? पण मी नाव सांगितल्यावर सर जोरजोरात हसू लागले, सर हसू लागले म्हणल्यावर, सगळी मुलं पण दबक्या आवाजात हसू लागली. सरांनी हसता हसता, माझ्या मागे तीन-चार ओळी सोडून उभ्या असलेल्या एका धिप्पाड मुलाकडे पाहिले आणि ते म्हणाले - काय शंकरराव, पोरगा लयच हुशार हाय की तुमचा, तुमी दोगबी येकाच इयत्तेत होय? आता सगळी मुलं माझ्याकडं बघून जोरजोरात हसत होती. मला पहिल्यांदा काय जोक झाला ते कळालंच नाही पण नंतर लक्षात आलं. मी हळूच मागच्या ओळीतल्या शंकरकडे पाहिलं, तोपण पोट धरून हसत होता. मला एकदम बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला, काही सुचेना. देवा मला रडू नको येवूदे, देवा प्लीज.
बरर्र, कुट्ल्या शाळंतन आलास तू?
वडनीळ सरांच्या प्रश्नाला उत्तर द्यावसंच वाटतं नव्हत मला. मी म्हणालो - नवीन मराठी माध्यमिक शाळा. 
सर आपल्या हातातल्या ओबडधोबड लाकडी पट्टीला कुरवाळत म्हणाले - आताच्यामायला, नवीन शाळेतून जुन्या शाळंत आलास की रे. मुलं परत जोरात हसायला लागली. मला हा तास कधी एकदा संपेल असं झालं होतं. एकतर प्रार्थनेनंतर कधी पीटीचा तास असतो का? प्रार्थनेनंतर मराठीचा तास असायला पाहिजे खरंतर, पण इकडं सगळच वेगळं दिसत होतं. एकतर प्रार्थना म्हणजे फक्त प्रतिज्ञा आणि मग जनगणमन झालं होतं.
कुट्ल्या गावात होती तुमची ही नवीsssन मराssssठी शाळाआ? 
मी म्हणालो - गुहागर. 
सर परत जोरजोरात हसू लागले, हसताहसताच म्हणाले - गुहागर असं गाव हाये होय, आमच्याकडं तर सकाळी संडासला जायचं असंल तर म्हणतात, जरा गुहागरला जावून येतो.  सगळी मुलं जोरजोरात, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून हसू लागली होती. देवा, हे स्वप्न असूदे, देवा, प्लीज. माझे डोळे भरुन आले होते, ओठ मुडपून कसतरी मी रडू थांबवलं. आता पुढं सर काय प्रश्न विचारतील या विचारानेच मी घाबरलो होतो.
तेवढ्यात सर जोरात ओरडले - गब्बसा, रांड्डच्च्यांनो, दात काय काढायलाय्त? चला, चार फेर्‍या मारा. 
सगळी मुलं चिडीचूप शांत झाली. पुढचा पळायला लागला, त्याच्या मागोमाग मी गप पळू लागलो. लांबवर गेल्यावर मी मागे पाहिले, वडनीळसर कानात बोट घालून, कान हलवत होते आणि स्वत:शीच हसत होते. पळताना शेजारच्याला, त्याचं नाव विचारावं का अस मला वाटलं, पण त्याचा मगासचा हसतानाचा चेहरा आठवून मला काही बोलूसच वाटेना. या पीटीच्या तासात काही खेळच नव्हता, पळत पळत ग्राउंडला नुसत्या फेर्‍या मारत होतो आम्ही. थोड्या वेळाने एकदाची घंटा वाजली.
दप्तरांच्या ढीगात माझं दप्तर एकदम खाली गेलं होतं, मी वरची दोन-तीन दप्तरं बाजूला ठेवली आणि माझ दप्तर ओढून काढलं. माझं रडू आता गेलं होतं.

मी वर्गात गेल्यावर दारापाशीच उभा राहिलो होतो, सगळी मुलं बसत होती तोवर बाई आल्या. हातातली फाईल टेबलावर ठेवतच मला म्हणाल्या - पाटील ना तू? मी म्हणालो - हो. 
पूर्ण नाव काय रे तुझं? विसरलेच बघ मी. मला अगदी नको असलेलाच प्रश्न विचारला त्यांनी. मी हळू आवाजातच म्हणालो - चिन्मय पाटील. बाई म्हणाल्या - हां हां, आठवलं आता, चिन्मय आणि पाटील, हं, गंमत आहे. 
एवढं बोलून त्यांनी मला खुणेनंच पहिल्या बेंचवर बसायला सांगितलं. 
तिथे आधीच दोघे होते, मीपण तिथंच? मी तसाच सरकून उरलेल्या जागेत बसलो. बाईंनी आमच्याच बेंचवर तीनदा डस्टर जोरजोरात आपटला आणि हजेरी सुरू केली. हजेरी झाल्यावर सगळी मुलं परत आपापसांत बोलू लागली. मी शेजारी बघितलं तर ही दोघं, मधे बसलेल्याच्या दप्तरात अंधारात काहीतरी बघत होती. बाई काही शिकवतच नव्हत्या, त्यांची त्यांची फाईल काढून काहीतरी लिहीत होत्या.
मी इकडेतिकडे बघत वर्गाचं निरीक्षण करु लागलो, तेवढ्यात बाईंनी मला बोलावलं. मी टेबलापाशी गेलो तर त्या कसलातरी  फॉर्म भरत होत्या. मला म्हणाल्या - कसं रे मधेच दाखल होता तुम्ही, बरं, तुझ्या नावाचं स्पेलींग काय? 
मी परत हळू आवजातच बोललो - सी एच आय एन एम ए वाय. 
त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाल्या - एन एम? म्हण परत? 
मी म्हणालो - एन एम. 
त्यांनी सुस्कारा टाकला आणि म्हणाल्या - बर्र, बर्र, एन एम ! खालच्या मजल्यावर ऑफिस आहे, तिथे जाऊन हे फॉर्म देवून ये, तिथे एक सर असतील त्यांना म्हणावं वत्तूरकर बाईंनी दिले आहेत. काय सांगशील? वत्तूरकर. नाहीतर तू उत्तुरकर म्हणायचा.
मला एकदम बरं वाटलं, मी निघणार तेवढ्यात थांबवून त्यांनी मला विचारलं - आई काय करते तुझी? 
मी म्हणालो - घरीच असते. 
मग पुढे त्या म्हणाल्या - शिकलीय का? 
मला खूप छान वाटलं, मी लगेच सांगितलं - हो, एम. ए. आहे.
बर्र, जा, नीट देवून ये फॉर्म्स  - बाई हसत म्हणाल्या.

माझ्या शेजारी बसलेली दोघं, योगेश सपकाळ आणि कौस्तुभ देशपांडे नावाची मुलं होती. ती त्यांच्यात्यांच्यातच होती. आपलं नाव सांगितलं, माझ्याकडे बघून एकदोनदा हसली पण नंतर काही बोलली नाहीत, एकमेकाशी मात्र खूप कायकाय बोलत होती, आणि दोन तासांच्या मधे सारखं दप्तरात डोकावत होती. 
मधली सुट्टी झाली. मी माझा डबा उघडून खाणार तेवढ्यात मागून पाठीत एक जोरात गुद्दा बसला. मी मागे वळून पाहतो तर पाठोपाठ खाडकन कानाखाली. मी थरथरू लागलो, आणि डोळ्यातून पाणी येवू लागलं. 
एक आडदांड मुलगा माझ्याकडे बघत म्हणाला - परत माझ्या दप्तराला हात लावायचा नाही हां, सांगून ठेवतो. 
मी रडतरडतच म्हणालो - मी नाही लावला हात. खरंच, आईशप्पथ. 
तो म्हणाला - गप्पे शप्पथ, तुझ्याआयचा पुचा तुझ्या. माझे केस ओढून तो आणि त्याच्याबरोबरचा एक मुलगा वर्गाबाहेर निघून गेले. 
मी बेंचला डोकं टेकवून रडू लागलो. मागून सपकाळ म्हणाला - अरे तो चांडक, त्याच्या नादाला लागू नकोस, हे घे, भजी खाणार? 
मी नको म्हणालो आणि तसाच रडत रडत माझा डबा संपवला. मला आईची खूप आठवण येत होती. कधी सुटणार शाळा?
हा दिवस संपतच नव्हता. अधेमधे चांडक माझ्याकडे बघून गुद्द्याचे हावभाव करत होता आणि त्याच्या शेजारचा मुलगा हसत होता.

एकदाची घंटा वाजली, उगाच चांडकने पकडायला नको म्हणून मी सपकाळ आणि देशपांडेच्या मागं मागं पळतच, वर्गाबाहेर गेलो. गेटपाशी लांब आई दिसत होती. मला आईला बघूनच खूप रडू येवू लागलं. मी कसंबसं रडं थांबवल आणि पळतपळत आईपाशी गेलो. 
मला वाटलं, आई बघून छान हसेल पण ती मला म्हणाली - काय रे चिन्मय? असा का दिसतोयस? बरं वाटत नाही का? कुणाशी भांडाभांडी झाली का? 
मला आईचा राग आला, मी म्हणालो - नाही गं, भूक लागलीय खूप, चल घरी लवकर. 
रस्ता क्रॉस केल्यावर बसस्टॉप होता, तिथे जास्त गर्दी नव्हती, शाळेच्या बाजूच्या स्टॉपवर मात्र तुडुंब गर्दी होती. रस्ता क्रॉस करताना आईने माझा हात धरला, आलं हे हिचं नेहमीचं. नेहमी असं करायचो नाही पण आज मला राहवेना, मी माझा हात सोडवून घेतला आणि जोरात ओरडलो - उगाच काय गं हात पकडतेस, मी काय कुक्कुलं बाळ आहे का आता? मला येतो रस्ता क्रॉस करता. 
मला वाटलं आई आता ओरडणार. निदान, नीट शांतपणे आपलं म्हणणं सांगावं हे तरी ऐकायलाच लागणार. पण आईचा मूड काय भारी होता देव जाणे, ती म्हणाली - बरं बाबा, एकटा चल, मी नाही धरणार परत तुझा हात. मग म्हणाली - कॅडबरी पाहिजे का? मला खरंतर हवी होती पण मला इथे खायची नव्हती - च्चक्, नको. 
आम्ही रस्ता क्रॉस करुन बसस्टॉपवर, बसची वाट बघत थांबलो. तिथे आमच्या वर्गातला एक मुलगा उभा होता, अगदी मला नको तोच - शंकर पाटील. तो माझ्याकडे बघत होता, हसल्यासारखा वाटला. 
आई म्हणाली - चिन्मयच्या वर्गात आहेस का रे तू? नाव काय तुझं? तो म्हणाला - शंकर गणाजी पाटील. आईने त्याला विचारलं - कॅडबरी खाणार का? आणि देवूनही टाकली. अशी कशी आहे यार ही. मग अचानक उगाचच बाजूला जावून उभी राहिली. 
शंकर मला म्हणाला - कुठल्या बसने जाणार तू? 
मी म्हणालो - सूतगिरणी, आणि तू? 
मी दोन बशी बदलून जाईन, इथून पहिले यडबूर आणि मग तिथून पुढे हातकणंगल्याला एस्टी असते. 
मग आम्ही कायकाय बोलू लागलो, त्याने मला सगळ्या सरांची नावं सांगितली, बाईंची नावं सांगितली. बोलताना मधे मधे तो खूप शिव्या देत होता - म्हणजे मला नुसते कळत होते त्या शिव्या आहेत ते, अर्थ समजत नव्हता. 
लांबून यडबूर बस येताना दिसली तेव्हा तो म्हणाला - उद्या माझ्याशेजारी बस वर्गात. 
मी म्हणालो - सगळे हसतील आपल्याला. 
तो बसमधे चढतच म्हणाला - कुणाचा बा हसअल ?

यडबूर-सूतगिरणी-यडबूर बस आली. आईच्या पाठोपाठ मी चढलो. आई म्हणाली - वेळ लक्षात ठेव. नीट चढशील ना? पायरी बघूनच पाय टाकायचा हां. झालं सुरू. मी आपली मान डोलावली. 
मला सारखा वडनीळसरांचा आणि चांडकचा चेहराच आठवत होता. मग आईबाबांचा. आई समोर आहे पण चांडकचा चेहरा आठवला की मला आई सकाळी कशी दिसते ते उगाच आठवत होतं.

रात्री बाबा उशीरा आले, माझ्या डोक्यावरुन त्यांच्या स्टाईलने हाताची बोटं फिरवून म्हणाले - काय चटर्जी, झोपला नाही का? मी पार झोपायलाच आलेलो. गाद्यांवर लोळत मी चांदोबातली चित्र बघत होतो. मग बोर झालो आणि एखादं चमत्कार-बिमत्कार असलेलं चरित्र मिळतंय का बघायला म्हणून दुसर्‍या खोलीत गेलो. बाबांना आई हळूहळू आवाजात कायकाय सांगत होती. थोड्या वेळाने आई नेहमीप्रमाणे जोरात म्हणाली - तुम्हाला काही सांगण्यातच अर्थ नाही. 
मला भारी पुस्तक मिळाले तोवर, सांबनाथ महाराजांचं चरित्र. काकांची असली बरीच कायकाय पुस्तकं होती. आईचा आवाज - झोप रे आता, उगाच रात्रीच जास्तवेळ वाचत बसू नकोस.
*

मला आज आईबरोबर शाळेत जायची विशेष इच्छा नव्हती, माझामला रस्ता आणि बस कळली होती पण आई म्हणाली आहे पहिले दोन दिवस ती सोडायला येणार म्हणजे ती येणारच. 
सगळं आवरल्यावर बाबा म्हणाले - चलो चटर्जी, मी सोडतो आज शाळेत तुला. 
मला वाटलं, यांना काही कळाले का काय? शाळेत येवून भेटणार-बिटणार नाहीत ना? म्हणून मी विचारलं - पण बॅंकेत जायचं नाही का आज तुम्हाला?
जायचंय की लेका, पण आधी मला एका खातेदारांकडं जायचय, ते तुमच्या शाळेच्या साईडलाच राहतात, तुला सोडून जाईन, मग तिथून बॅंकेत. येताना बसने नीट येशील ना, का आई येवूदे आणायला?
मी आनंदानेच म्हणालो - नको नको, मला नीट कळाला आहे रस्ता, बसचं सांडगपण कळलं आहे नीट.
वाटेत मी बाबांना विचारलं - इथून परत गुहागरसारख्या एखाद्या चांगल्या शहरात बदली होईल का हो आपली? तर ते म्हणाले - सगळीच गावं चांगली असतात. 
आता काय बोलणार पुढे, यांना काय माहीत, वडनीळ सर कसे आहेत आणि तो चांडक कसला आहे.
शाळेपाशी स्कूटरवरून उतरताना बाबा म्हणाले - हे बघ चिन्मय, उगाच कुणाशी भांडण करू नकोस. पण कुणी आपल्याला चार रट्टे दिले तर आपणपण त्याल दोन द्यायचे. कमी मार देवून, जास्त मार खाल्ला तरी हरकत नाही. पण ऐकून नाही घ्यायचं.

प्रार्थनेच्या रांगेतच शंकरने मला हाक मारली, माझे मित्र होतात हळूहळू पण पहिल्याच दिवशी स्वत:हून आजपर्यंत कुणी नव्हतं बोलावलं मला, मी जरा हळूहळूच गेलो त्याच्यापाशी. तो खणखणीत आवाजात जनगणमन म्हणत होता, मलापण उत्साह आला आणि जय हे ला मीपण असला आवाज चढवला, आणि आम्ही दोघे एकमेकाकडे बघून हसायला लागलो. आज वडनीळ सर आलेच नव्हते. म्हणजे आलेले पण पीटीच्या तासाला आले नव्हते. 
मी शंकरला विचारलं - आपला पहिलाच तास कसा काय असतो रे पीटीचा, आणि आपणच कसे फक्त ग्राउंडवर, बाकी तुकड्या? 
तो म्हणाला - अरे वत्तूरकर बाईंना यायला उशीर होतो म्हणून वडनीळ सर घेतात पहिला तास, नाहीतर खरं पहिला बाईंचाच असतो. ग्राउंडवर कोणीच थांबले नाही सगळे वर्गात परत चालले, मी शंकरला विचारलं काहीतरी खेळायचं का तर तो फक्त ह्यॅ म्हणाला. 
मी आजपर्यंत कधी शेवटच्या बाकावर बसलो नव्हतो, पण सपकाळ आणि देशपांडेशेजारी पहिल्या बाकावर बसण्यापेक्षा बरे म्हणून शंकरशेजारी बसायला गेलो. 
मधेच चांडकने माझ्याकडे पाहिले आणि शंकरकडेपण पाहिले. शंकर करकटाने बाक कोरत बसला होता, मी विचारलं काय करतोयस तर म्हणाला काही नाही - आपल्याकडून जास्त फी घेतात उगाच, आपण असच बाक कोरायचे मग नवीन वर्षी शाळेला नवीन बेंच घ्यायला लागतो. 
शेजारच्या बेंचवरचा मुलगा तर सरळसरळ झोपला होता. मी तोंडाने छोटे फुगे सोडत बसलो. शंकर करकटक थांबवून विचारलं - अरे हे काय करतोयस? मी म्हणालो - फुगे. 
शंकरचे डोळे एकदम मोठे झाले होते, तो जवळजवळ ओरडलाच - अरे पण फक्त तोंडानेच कसे सोडतो आहेस, साबणाचं पाणी आणि गव्हाचं चिपाड लागतं की. 
मला गंमत वाटत होती, मी म्हणालो - अरे, अवघड काही नसतं, आपल्या जीभेच्या खाली लाळग्रंथी असतात, त्यातून थुंकी येते तोंडात. खालच्या दातांच्या मागे जीभ अशी लाळग्रंथींवर दाबायची मग हळूच एक फुगा जीभेच्या टोकावर येतो, त्याला फुटू न देता हळूच फुंकर मारायची, हे बघ अस्सं.
शंकरने माझ्या खांद्यावरच हात ठेवला आणि म्हणाला - मला जमतय का बघ, नीट.
मी नीट जवळून पाहिलं, शंकरच्या तोंडाला दुधाचा वास येत होता. आई म्हणते असा काही वास नसतो दुधाला, पण असतो मला येतो.
जमेल रे, शंकर तुला एक-दोन दिवसात, तू सगळ एकदमच करतोयस, आधी फक्त फुगा तयार करायची प्रॅक्टिस कर, मग नंतर फुंकर मार. 
शंकरने मान डोलावली आणि आता काही बोलू नकोस म्हणाला.
थोड्यावेळाने वत्तूरकर बाई आल्या, हजेरी झाली. मधल्या सुट्टीत चांडकने मला मुतारीपाशी उगाच धक्का दिला, मी रागाने पाहिले तर परत आणि काहीतरी शिवी दिली. मला शंकरला सांगावेसे वाटले पण मी काही बोललो नाही. 
शाळा सुटल्यावर आम्ही दोघे बसस्टॉपपाशी गेलो, शंकर म्हणाला - बससाठी किती रुपये आहेत तुझ्याकडे?
दोन.
शंकरने आपल्या खिशातून तीन रुपयाची नाणी काढली आणि म्हणाला - चल, तुझे दोन आणि माझे तीन, पेरु आणि दोन भेळ येतीलच की.
मी घाबरून म्हणालो - मग घरी कसं जायचं?
शंकर म्हणाला - अरे सोप्पय, स्कूटरवरून जाणार्‍या लोकांना लिफ्ट मागायची. 
मी थोडा घाबरलो होतो - आणि कोणीच नाही भेटले तर?
सरळ बसमधे चढायचं, आणि कंडक्टरकाकांना सांगायचं - मला तिकीटाला दिलेले पैसे हरवले, मी उद्या नक्की देईन, माझं नाव लिहून घ्या असंपण म्हणायच. ते आरामात बसमधे चढू देतात आणि दुसर्‍या दिवशी काही विचारतपण नाहीत. पण रोज नाही असं करायचं, कधीतरीच गंमत.
मी म्हणलो - तुला कसं कळलं हे, तुलापण कोणी सांगितलं का? तर शंकर म्हणाला - नाही, मला माहितीय असंच.
मला लगेच लिफ्ट मिळाली.

मला फार भारी वाटत होतं, घरी गेल्यावर आईला सांगावसं वाटत होतं, पण नाही सांगितलं.
*

सकाळी शंकरला वडनीळसरांनी खूप मारलं, थुकशील का परत थुकशील, असं ओरडत ओरडत, गुडघ्याच्या मागं दहा पंधरा पट्ट्या मारल्या. तो शाळेत आल्यापासूनच एकदम एकदम शांतशांत होता. शेवट वत्तूरकरबाईंच्या तासाला मी विचारलं - काय झालं रे, बोलत का नाही जास्त आज, मारलेलं दुखतंय म्हणून का? 
तर तो म्हणाला - ह्या. अरे, माराच काय, मला सकाळपासूनच सांगायच आहे खरंतर - तू दिलेल्या पुस्तकातले दोन चांदोबा सापडत नाहीयेत. तुझी आई रागवेल का तुला? मी दादांना सांगेन, ते देतील भरून.
मला हसूच आले - अरे नाही रे, भरूनबिरून नको. आई नाही रागवायची, पुढच्यावेळी नीट ठेव म्हणेल, पण रागावणार तर नाहीच, अजिबात, ह्या.

मधल्या सुट्टीत मी हात धूत होतो तर हा ओरडतच आला - अरे चिन्या चल लवकर, चल. कुठंबिठं विचारायच्या आत त्याने मला मागच्या गेटने ओढतच नेलं. दलाल चौकात खूप गर्दी आणि तीन घोडे होते. एक माणूस भिंतीत खिळा ठोकल्यासारखा घोड्याच्या पायात खिळे ठोकत होता. एक आख्खा नाल ठोकून होईस्तोवर शंकरची कॉमेंट्री सुरू होती - बघ साल्या तो घोडा रडतोय तरी का? हां, बघ च्यायला घुसलाच आता, अजून एकच खिळा राहिला आहे. 
शेवट मी म्हणालो - चल रे, नाहीतर वडापाव आपल्या पायात खिळे ठोकेल. शंकर आणि मी हसतहसत परत चाललो. 
वाटेत तो म्हणाला - अजून पुढंच्या चौकात दोन बार आहेत तिथे मधे बैलाला आणतात आणि चढवतात, बघायला येणार का कधीतरी? 
मी म्हणालो - हां चालेल की, च्यायच्चा शंक्या तू बेक्कार बाराचा आहेस रे.

पुढच्या तासाला परत वडनीळ सर आले - शंकर, चांडक आणि तीनचार मुलांची नावं घेतली आणि त्यांना घेवून चालले. शंकर म्हणाला आंतरशालेय क्रिडामहोत्सवाची तयारी. वर्गातून बाहेर पडताना सर विसरल्यासारखं थांबले आणि मला म्हणाले - ए गुsssssहागरवाल्या, चल, तुला धावयला टाकतो, सकाळी चांगली फेरी मारतोस.

मला बाबा उशीरा आले की आवडायचं नाही. लवकर आले की ते मला कायकाय मस्त गोष्टी सांगत बसायचे, बॅंकेतले जोक, फरक कसा काढायचा, असलं काय काय. हल्ली बाबा घरी खूप उशीरा यायचे आणि हळू हळू बारीक आवाजात आईला काहीतरी कामाचं सांगत बसायचे. पण आजकाल आईबाबा जास्त भांडत नव्हते त्यामुळे मला बरं वाटायचं. कधीकधी बाबांबरोबर साठेकाकापण यायचे, मग उशीर झाला असला तर आई साठेकाकूंना हाक मारायची. मग काकू त्यांचा स्वयपाक आणि पियूला घेवून जेवायलाच यायच्या - पियूशी खेळायला जाम गंमत येते. ती काही बोललं तरी दाद्दा दाद्दा म्हणते आणि हसते.
*

संध्याकाळी अचानक साठेकाका आले, बरोबर काकू आणि पियू पण होते. काका एवढ्या लवकर कसे आले असा विचार करतोय तोवर काका मला म्हणाले - अरे पटकन जा आणि रिक्षा घेवून ये, गांधी चौकात जायचय म्हणाव. मी रिक्षा घेवून आलो तोपर्यंत आई, काका काकू दारात उभे होते. आईचा चेहरा एकदम उतरलेला. मी विचारलं काय झाल तर काका मला म्हणाले - जरा आपलं काम आहे पोलिस स्टेशनमधे, चल तुला दाखवतो कसं असतं सगळ तिथं. बाबापण आहेत तिथेच. 
आई म्हणाली - नाहीतर हा राहूदे का? 
काकू लगेच म्हणाल्या - अहो, तेच म्हणणार होते मी आत्ता, तो, पियू आणि मी थांबतो आपल्या घरी. जेवण करून झोपेल वाटल्यास आपल्याकडेच.
साठेकाका दोघींकडं बघत म्हणाले - अहो, तुम्हाला कळत नाही हो वहिनी, हा असूदे बरोबर. काही नाही होत.
आई मला म्हणाली - जा पटकन शर्ट बदलून ये.
काका म्हणाले - नको, नको अगदी घरातल्याच कपड्यांवर चल, वहिनी आता तुम्ही चला लवकर.
आम्ही रिक्षातून गांधी चौकात आलो, काकांनी डायरेक्ट माझा हात धरला आणि आम्ही स्टेशनमधे आत गेलो. तिथे समोर एक इन्स्पेक्टर होते, बहुतेक इन्स्पेक्टरच असतील. त्यांच्या समोर एका खुर्चीवर बाबा बसलेले. दुसर्‍या खुर्चीवर एक गलेलठ्ठ माणूस होता, त्याच्या मागे, फाईली घेवून अजून एक माणूस होता. 
बाबा इन्स्पेक्टरांना काहीतरी समजावून सांगत होते - हे बघा पूर्ण ऐकून घ्या साहेब तुम्ही माझं, ...
साठेकाकांनी मला आणि आईला जरा लांबच्या बाकड्यावर बसवलं, इन्स्पेक्टरांच आमच्याकडं लक्ष गेलं, त्यांनी माझ्याकडे बघितल, मला काय करावं कळेना, मी त्यांना पटकन जयहिंद केलं. 
काका, बाबांच्या शेजारी आणि एक खुर्ची घेवून बसले. 

सगळ्यांच काय काय बोलणं चालू होतं. बोलण काय भांडणच. गलेलठ्ठ माणूसाला आणि इन्स्पेक्टरांना, बाबा सारखं, अहो शेठ, साहेब, शेठजी, ऐका माझं असं म्हणत होते. मला कंटाळा आलेला, आईकडं बघितलं तर ती आठ्या घालून सगळं बघत बसली होती. घरी कधी जायचं विचारण्यात काही अर्थ नव्हता. मी आजूबाजूला पाहिलं तर, एका पोलिसमामांनी, माझ्याकडे बघून दोन्ही भुवया उडवल्या. मी हसलो तर ते म्हणाले - चहा पिणार का? मी मानेनेच नाही म्हणालो.
बराच वेळ गेला, मी बोर झालो होतो.
अचानक शेठजींचा आवाज चढला आणि मी बघू लागलो - 
हे बगा, इन्स्पेक्टर साहेब, मला कर्जबिर्ज जास्त काय माहित नाही. हे पाटीलसाहेबांनी रात्री गोडावून ताब्यात घेतलं, आणि सील लावलं. माझ्या पोराला काय कळालं नाय, त्याची काय किल्ल्या दिल्या म्हणून सही नाही. त्याच्या गोडावूनमधे माझे दहाहजाराचे तागे होते ते चोरीला गेले आहेत. चोरीला गेले का, पाटीलसाहेबांनी स्वत: विकले मला नाय माहीत. मला एकतर ते परत द्या नाहीतर मी कंप्लेट करणार, हे आमचा मुलगा आणि दोन बाजूचे दुकानवाले विटनेस आहेत. काय असेल तसं पाटीलसाहेब तर आत्ताच सांगा, आमी सबुरीने घेवू. सील तुमीच लावले, त्याच्याआदी माल होता.
बाबा ताडकन उठून उभे राहिले आणि जोरातच म्हणाले - 
ओ शेठ, वडिलांच्या वयाचे आहात म्हणून गप्प बसलोय. दुपारपासून नीट समजावून सांगतोय, मराठी कळत नाही का? सकाळी बॅंक जप्तीला येतीय कळंल, तर सगळे लोक गोडाऊन लुटून नेतील एवढी देणी आहेत - असं तुमच्याच मुलानं मिनतवार्‍या करून सांगितलं मला. आता माझ्यावरच असं उलटताय? रितसर पंचनामा झालाय, काय? रात्री सील लावताना तुम्हाला फोन आलेला ना? तेव्हा का नाही आला, तुमचे दहाहजाराचे तागे घ्यायला? तेव्हा तुम्ही मस्त जेवून, ढेरीवर हात फिरवत झोपला होता. फुकटची पचवायची सवय लागली आहे तुम्हा लोकांना. 
काय कंप्लेंट करायची ती करा, मी कुणाचा एक छदामही घेतलेला नाही, वर बसलाय तो बघतोय. 
हे बघा इन्स्पेक्टरसाहेब - मी घरी चाललो आहे. दुपारपासून उगाच माझा वेळ वाया घालवत आहात. मला आत टाकयचं असलं तर आत्ता लगेच आत टाका, उगाच तेचतेच परत सांगत बसणार नाही मी तुम्हाला. 
इन्स्पेक्टरांकडे बाबा असे बघत होते की मला वाटलं आता मारतात का काय त्यांना. आत्या मला नेहमी म्हणते - अरे तुझे बाबा शांत आहेत तोवर ठीके - एकदा चिडले की काही खरं नाही.

बाबा उठून आपल्या फायली पिशवीत घालत होते, साठेकाका म्हणाले - शेठजी, आम्ही ऐकतो म्हणून माजला काय? जरा वकुबानं बोला, आणि कंप्लेंट कराच तुम्ही, मग उद्यापासून तुम्हाला कुठल्या बॅंकेतून ओव्हरड्राफ्ट मिळतो ते बघतो मी. 
बाबा माझ्या आणि आईपाशी आले आणि म्हणाले - चल गं, चलो चटर्जी.
बाहेर आल्यावर साठेकाकांना  बाबा म्हणाले - मी निरोप सांगितला तर चांगलीच युक्ती काढलीस रे, तू.
काका म्हणाले - अहो साहेब, माझ्या डोक्यात नाही आलं. शिंदेवकीलांना फोन केला होता, त्यांनी सांगितलं. ते उद्या गावात येत आहेत, मग काही काळजी करू नका म्हणाले. शिवाय मी स्टेट बॅंकेतल्या सोनवण्यांनापण युनियनचा निरोप दिला आहे.
बाबा हसत म्हणाले - अरे काळजी कसली, बसून कंटाळा आल होता मात्र, कर नाही तर डर कशाला?

साठेकाका आमची स्कूटर घेवून गेले आणि आम्ही रिक्षाने घरी परत आलो. मी काय झालं होतं नक्की, विचारलं तर बाबा जावूदेच म्हणाले. मग आईनी सगळं नीट सांगितलं - शेठजींच्या मुलाने कर्ज फेडलं नव्हतं म्हणून बॅंकेनं त्यांच गोदाम जप्त केलं होतं, ते सोडवायला म्हणून शेठजी अरेरावी करून पोलिसात खोटी तक्रार करेन म्हणत होते.
बाबा म्हणाले - या लोकांच नेहमीचं आहे, दिवाळं निघालं म्हणून बॅंकेची कर्ज फेडायची नाहीत आणि एकीकडं चारचाकी गाड्या फिरवायच्या. बाबा पुढं कुठली शिवी देणार होते ते मला कळालं होतं, आईकडं बघून ते गप्प बसले. मी हसलो म्हणताना तेपण हसले, मग आईपण.
*

क्रिडामहोत्सवासाठी आम्ही सकाळीच निघालो तिघंपण. तिथे आईबाबा प्रेक्षकात थांबले, मी वडनीळसरांना शोधत आत गेलो. शंकर म्हणाला, आज माझे आईदादापण आलेत. एकदम खुशीत होता. मीपण. मग आम्हाला सगळ्यांना वडनीळ सरांनी कोंडाळ्यात घेतलं. प्रत्येकाला नीट खेळा, लक्ष द्या सांगितलं. मी १०० आणि २०० मीटरमधे होतो. मग वडनीळ सर चांडक आणि शंकरला घेवून दुसरीकडं गेले. त्यांची मातीतली कुस्ती होती. 
मी १०० मीटरमधे दुसरा आणि २०० मधे पहिला आलो. अर्ध्या तासाने शंकर ओरडतच आला - तो कुस्तीत तिसरा आला होता. आजपर्यंत आमची शाळा कुस्तीत कधी जिंकली नव्हती. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मागून वडनीळ सर आले तेपण प्रचंड खूश दिसत होते. त्यांनी आल्याआल्या आम्हाला सगळ्यांना कायकाय झालं विचारलं, मला म्हणाले - अरे खुळ्या, तू जरा जोर लावलास्तास तर शंबर मधेपण यायचास खरतरं. 
सर शंकरच एवढं कौतुक करत होते की, मोहिले शेवट म्हणाला - सर आम्हीतर पहिले, दुसरे आलोय की. सर म्हणाले - तुमी गपारे.
सरांनी आम्हाला एकेक वडापाव दिला, त्यांना कळालच नाही, आम्ही त्यांच्याबरोबर वडापाव खाताना एवढं का हसत होतो ते.

शंकर म्हणाला - चल, माझे आईदादा आलेत, आईला तुला बघायचय. मी म्हणालो - माझ्यापण बाबांना तुला भेटायचय. मला २०० च्या शर्यतीत धावताना आई दिसली होती आम्ही तिकडे चाललो. शंकर म्हणाला - ते बघ आमचे दादा. बघतो तर काय पांढर्‍या शुभ्र लेंग्यातले दादा बाबांना टाळी देत होते आणि दोघे जोरजोरात हसत होते. आई आणि शंकरची आईपण काहीतरी मनापासून बोलताना गढून गेलेल्या दिसल्या. 
मी शंकरला म्हणालो - अरे ते बघ, आपल्या आईबाबांची ओळख झालीसुद्धा. आम्ही ओरडत आमचे नंबर सांगत आपापल्या आईकडे गेलो. 
आम्ही त्या दोघींशी बोलतोय तोवर, बाबांनी शंकरच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला म्हणाले - अरे तू काय शंकर? आमच्या गणपतीचा दोस्त. तो जोरजोरात हसायला लागला. 
शंकरचे दादा म्हणाले - साहेब मी तुम्हाला मळ्यावर बोलावून दमलो, आता आपल्या पोरांची एवढी दोस्ती आहे कळाल्यावर तरी या की एकदा, काय वहिनी?
बाबा म्हणाले - मला कुठं माहिती दादासाहेब, तुमचा मुलगाच आमच्या चिन्मयचा शंक्या. आता तुम्ही दिवस सांगा, आम्ही हजर होतो बघा.
दादा हसले आणि म्हणाले - ठरलं तर मग, रविवारी सकाळीच जीप पाठवतो, तुमच्या पोराबरोबर आहे म्हणजे मला आता शंकरची काय काळजी नाही पुढची. तर बाबा हसत म्हणाले - पुढच्या वर्षाची काय गॅरंटी नाही बा दादासाहेब.

शंकर जीपनं आणि आम्ही स्कूटरनं घरी आलो.
*

शेवटचा पेपर झाल्यावर मी माझं पॅड आणि कंपासपेटी घेवून शंकरपाशी गेलो, कसा गेला अस विचारलं तर तो म्हणाला - गठ्ठ्यातून आणि आम्ही हसलो. 
तिकडून चांडक येताना दिसला मला, त्याचं पोस्टऑफिस उघड होतं. मी जोरात ओरडलो, ऐ चांडक, पोस्टात पत्र टाकायचय का? 
सगळी मुलं जोरजोरात हसू लागली. चांडक खाली बघून बटणं लावता लावता म्हणाला - गपे तुझ्यायचा पुचा. मी खाडकन त्याच्या डोक्यात पॅड हाणलं आणि आख्खा कंपासच त्याच्या कानापाशी मारला. तो कळवळत खाली पडला बघितल्यावर तर मला चेवच चढला - तुझ्यायच्या बोच्यात पाय चांडक्या, तुझ्याआजीला लाव्ला गाढव, साल्या, आज तुला सोडणार नाही मी - असे म्हणून, त्याच्या छातीवर बसून मी त्याला जोरजोरात मारू लागलो. 
शंकर ओरडला - अरे सोड रक्त येतंय त्याच्या नाकातनं, त्याचे बाबा शेठ आहेत मोठे, नाव सांगेल तो.

त्याच्या बोरांवर एक लाथ मारून मी उठलो - अरे छप्पन्न शेट पाहिलेत असले. चांडक्या, परत आईवरून काही बोलायचं काम नाही, सांगून ठेवतो.
***