Thursday, February 9, 2017

खडतर


माझ्या मेंदूवर मानसिक ताण आला आहे आणि त्यामुळेच उजवा डोळाही दुखतो आहे.(संशय). 

कुणाचे चूक, कुणाचे बरोबर, काय चूक, काय बरोबर? काही कळत नाही. कुणाचे का कोणाचे तेपण नाही कळत. कुणाचे किती चूक, किती बरोबर? मी जे चूक म्हणतो ते समोरची व्यक्तीपण चूकच म्हणते का? जर तसे नसेल तर माझ्यादृष्टीने तरी ते चूक का असावे. पण मग मी ते बरोबर मानले तर माझे सगळे बरोबर मानलेले चूक ठरणार का? मी लोकासाठी एवढा त्रास का घ्यावा? मी आत्ता प्यायलो नाहीये. ऑफिस, इन जनरल जीवनपण चढू शकतं माणसाला.

आपल्यापेक्षा गरीब लोक असतात, श्रीमंतपण असतात, त्यांचे विचार वेगळे असतात म्हणून ते चूक नाहीत. लोकांचा विचार केला पाहिजे, प्रत्येकाची एक बाजू असते ती समजून घेतली पाहिजे. पण आपले काय? 
शाळेतून पाल्याला आणायला गेटपाशी एकदम पुढे उभा राहिलो. एक बाई म्हणाली - असली कसली घाई, सगळ्यांना सोडणारेत. बायकांविषयी काही ग्रह बाळगायचे नाहीत. प्रत्येकजण वेगळावेगळ्या ग्रुपमधे उभे असतात. एकतर इथे रांग नाहीये, लोक कसेही कुठेही गप्पा मारत उभे आहेत. एकदा वॉचमनने आत सोडले आणि आपण मागे पडलो तर १०-१५ मिनीटे उशीर तरी नक्कीच. किती रमतगमत गप्पा मारत जातात, रस्ता अरुंद आहे, मागच्यांना पुढे जायचे असेल असा काही विचारच नाही. मी आणि एकजण रोज गेटपाशी एकदम पुढे उभे राहतो, लोकांना आणि या उपस्थित बायकांना पक्कं माहित आहे हे, रोजचं आहे. पुढे जायला जागा का करुन देत नाही मग तुम्ही मला? तुम्ही पुढे उभ्या असता तर मी गेलो नसतोच ना. परत घाई कसली म्हणजे काय? वेळेचा प्रश्न नाही, यांच्यामगं चालायचं म्हणजे काय बोलायची सोय नाही. एवढं हळू चाललं की पायच दुखतील माझे, असं मला वाटतं. त्यांच्या भूमिकेतून विचार करायचा म्हणलं तर, त्यांना आवडत असेल मैत्रिणींबरोबर रमतगमत जायला. शक्य आहे. सगळ्यांचच सगळं बरोबर असतं. 
दिवसभर उन्हातान्हात उभा असतो म्हणून या वॉचमनविषयी वाईट वाटावं तर तोपण असला डॅंबिसपणा करतो. चकाचक सूट्बूट घालून आलेल्यांना - अभी नही जा सकते सर अंदर, दस मिनीट रुकिये, असं अगदी प्रेमळ आवाजात सांगतो, अजीजीने. आमच्यासारखा एखादा दाढी वाढलेला बघितला की खेकसतयं - मागे व्हा वो, टाईम व्हायचाय अजून. तुझा पगार काय, झवाड्या? असा विचार येतो माझ्या मनात. पैशाचा सुप्त माज आहे म्हणजे आपल्याला, तरी काय बिझनेसमन नाही आपण, साधे नोकरदार तरी असं. मग ते अतियशस्वी माणसांच्या मनात थोडेफार असेलच की पैशाविषयी. त्यामुळे मग ते पिक्चरमधे असं गरीब माणसाशी प्रेम केल की विरोध करतात.

परवा चहा प्यायला गेलो पॅंट्रीत तर, एका कपाच्या वरच्या बाजूला चहाची गोल रिंग तशीच, नीट विसळला नव्हता कप. मित्र म्हणाला - देख साले कैसे साफ करते है, फ्री का पैसा चाहिये. दुसरा त्याला म्हणाला - तेरे कोड का १००% कव्हरेज होता है क्या बे, २-४ सिनारिओ छोडही देता है ना साले, जेयुनिट या एएफटी लिखतेसमय? तू जैसे कामचोर है वैसे ये पॅंट्रीबॉयभी. हा भडकला, म्हणाला मी १० दिवसाचे काम ५ दिवसात केले, माहितेय तुम्हा लोकांना. खरं होतं हे. याची मजबूरी होती मान्य आहे. पण तशीच पॅंट्रीबॉयचीही मजबूरी असू शकेल असा आमचा मुद्दा होता. असेलही, पण कप नीट घासला नव्हता ही सध्याची डोळ्यासमोरची फॅक्ट जशीच्या तशी मान्य करायला काय अडचण आहे. आपला मित्र कामचुकार नाही हे आम्हाला माहिते, तरी त्याची क्षुल्लक चूक काढली आम्ही. पॅंट्रीबॉय खरच कामचुकार असेल अशी शक्यता आहे हे पहिल्याप्रथम मान्य करायला काय हरकत आहे. आपण तसे केले तर असंवेदनशील ठरू असे मेंदूला वाटत असेल का?
जगणं कॉम्प्लेक्स झालं आहे. असं आदिमानवालाही वाटत असेल. परत तेच. आदिमानवाचा संबंध काय आत्ता, त्याला कसं का वाटेना? माझाच मेंदू माझ्याच विचांरावर जजमेंट देवून पुढचे विचार का निर्माण करतो? काय येडेगिरी आहे ही? सगळ्यांनाच असे होते का? अच्युत आठवलेसारखं होईल का माझं म्हातारपणी?

सगळ्यांचच सगळं बरोबर म्हणलं तर अध्यात्मिक लोकपण बरोबर. रिटायत्मिक लोक म्हणजे, रिटायर झाल्यावर अध्यात्माच्या मागे लागणारे लोक तर बरोबरच. मला तर ते आवडतातच. डोक्याला ताप नाही, आपलं आपलं काहीतरी अध्यात्मिक ॲक्टिव्हीटी करत बसतात. करुन करुन भागले आणि देवपूजेला लागले ही जीवनशैली बरोबरच आहे, एखाद्याला आवड असेल तर आपण कोण थांबवणारे?

तशी मेहनत तर प्रत्येकालाच करायला लागते. पूर्वी मला वाटायचं की, या मॉडेल पोरी काय च्यायला, उगाच हसायचं, फोटो द्यायचा आणि  पैसे घ्यायचे. एक दिवस एका जाहिरातीचं शूटिंग पाहिलं मी - पोरीच एकच काम होतं - विरुद्ध दिशेने एक गाडी येणार, हिला बघून चालक हॅंडब्रेक मारुन गाडी बरोब्बर वळवतो जागच्या जागी, आणि दार उघडतं. मग ही बाळ त्यात चढणार. दिवसभर ते हॅंडब्रेकचं लफडं जमत नव्हतं. दर दहा मिनीटांनी ही गुणी पोर, मेकअप/टचप करुन, पर्स घेवून तयार होऊन उभी राहणार. सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहापर्यंत या लोकांच हेच सुरू होतं - मेकअप, टचअप, स्टॅंडअप. साडेसहा काय, पार प्रकाश आहे तोवर, धर्मयुद्धाचा नियमच जणू. मला दिसत होतं ऑफिसच्या खिडकीतून, वाटतं सोप्प पण अवघड आहे. तेव्हापासून तर मला, नाना पाटेकर असं म्हणाला-वाले वॉटसॅप फॉर्वरड खरंच वाचावेसे वाटतात.

लहान मुलांचं तरी काय यार, कोणीही येतं आणि उचलून घेतं, कधी बाहेर आणि काहीही बोलतात लाडे लाडे, त्यांना त्रास होत असेल. मस्त बिचारं रमलं असतं कशाततरी लोक येणार, प्रेमाने घेणार. त्रास. मला झाला असेल का लहानपणी, देव जाणे.

सगळ्यांचच जीवन खडतर आहे.

No comments: